धर्माबाद/कुंडलवाडी | कुंडलवाडी शहर व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सततच्या पावसामुळे कोटग्याळ–माचनूर मार्गावरील पुलावरून पाणी वाहू लागल्याने गुरुवारी (३० जुलै) सकाळी ११ वाजल्यापासून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे कुंडलवाडी व माचनूर गावांमधील संपर्क तात्पुरता तुटला आहे.


पुलावरून वेगाने पाणी वाहत असल्याने संभाव्य अपघात टाळण्यासाठी पोलिस व महसूल प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व प्रकारची वाहतूक थांबवली आहे. नागरिकांनी जीव धोक्यात घालून पूरग्रस्त पुल ओलांडू नये, तसेच पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


या वाहतूक बंदीचा फटका शालेय विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि अत्यावश्यक कामांसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना बसत आहे. दुसरीकडे, सततच्या पावसामुळे परिसरातील नाले आणि ओढे दुथडी भरून वाहत असून खरीप पिकांना या पावसाचा मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, हवामान विभागाच्या पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे, पूरस्थिती असलेल्या भागात जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




