Prataprao Patil Chikhlikar : लोहा तालुक्यात पाणीटंचाई आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा – प्रतापराव पाटील चिखलीकर

लोहा| तालुक्यातील पाणीटंचाई निवारण आराखडा केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी, अशी स्पष्ट सूचना आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली. गावांनी ज्या गरजा नोंदविल्या आहेत त्यांची तातडीने पूर्तता करावी. हातपंप दुरुस्तीसाठी कोणत्याही गावातून पैसे घेऊ नयेत, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.


लोहा तहसील कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (१८ फेब्रुवारी) दुपारी दोन वाजता पाणीटंचाई निवारण आढावा बैठक पार पडली. बैठकीस कंधार उपविभागीय अधिकारी नरवटे, तहसीलदार विठ्ठल परळीकर, नगराध्यक्ष शरद पवार, उपनगराध्यक्ष करीम शेख, कंधार उपनगराध्यक्ष मन्नान चौधरी, माजी पंचायत समिती सभापती आनंदराव शिंदे, कृउबा उपसभापती अन्नाराव पवार, विविध विभागांचे उपअभियंते, गटविकास अधिकारी कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी कासराळे, जीवन प्राधिकरण व जि.प. बांधकाम विभागाचे अधिकारी, वीज महावितरणचे अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे, तसेच माजी सरपंच, ग्रामसेवक व कर्मचारी उपस्थित होते.

आमदार चिखलीकर म्हणाले की, गावनिहाय पाणीटंचाई आराखड्याची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे. अधिकारी-कर्मचारी यांनी गावात जाऊन लोकांच्या तक्रारींचे निराकरण करावे. घरकुल, सिंचन विहीर, जलजीवन योजना व वीज मंडळासंदर्भातील तक्रारींबाबत संबंधित विभागांनी तातडीने उपाययोजना कराव्यात. लोकांची कामे वेळेत पूर्ण होणे अत्यावश्यक आहे.


जलजीवन योजनेबाबत असंख्य तक्रारी प्राप्त झाल्याने लवकरच जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, संबंधित कंत्राटदार व गावातील प्रमुख यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. बळीराजा पांदण रस्त्यांबाबतही गावनिहाय बैठका घेण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.


प्रत्येक गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, ग्रामपंचायत कार्यालये व परिसर स्वच्छ ठेवणे याला प्राधान्य द्यावे. ग्रामविकास अधिकारी व गावातील पदाधिकाऱ्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. बैठकीच्या प्रारंभी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पाणीपुरवठा उपअभियंता श्री. बनसोडे यांनी गावनिहाय आढावा सादर केला. उपस्थितांनी विविध अडचणी मांडल्या.

सुनेगाव पाणीपुरवठा योजनेची चौकशी होणार
सुनेगाव येथील पाणीपुरवठा योजनेबाबत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. योजना पूर्ण झाली असली तरी गावकऱ्यांना वेळेवर पाणी मिळत नसल्याची बाब निदर्शनास आली. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी नरवटे, पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता, गटविकास अधिकारी व अन्य संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमण्याची घोषणा बैठकीत करण्यात आली. त्यामुळे सुनेगाव येथील जलजीवन योजनेची सखोल चौकशी होणार आहे.



