नांदेड| ग्रामपंचायत अधिकारी सक्षम आणि कार्यतत्पर असतील तर गावाचा कायापालट शक्य आहे, असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांनी केले. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात नव्याने रुजू झालेल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांसाठी आज बुधवार दिनांक 8 जानेवारी रोजी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे व ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा जाधव-कापसे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे त्या म्हणाल्या, गावस्तरावर शुद्ध पिण्याचे पाणी, शाश्वत स्वच्छता तसेच शाळा व अंगणवाडीतील पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देण्याची गरज आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत उपलब्ध 263 प्रकारच्या कामांचा उपयोग करून गावाचा विकास साधावा असेही त्या म्हणाल्या. कायदा व सुव्यवस्थेचे पालन करत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात. लोकसहभागातून जिल्हयातील नागापूर, हाडोळी, नारवट, जवळगाव, येरगी, शिराढोण आदी गावांनी विकास साधला आहे. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी नव्याने रुजू झालेल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी नवी ऊर्जा व उत्साहाने काम करत गावाच्या विकासासाठी आपली भूमिका बजावावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे यांनी केले. सूत्रसंचालन मिलिंद व्यवहारे यांनी तर उपस्थितांचे आभार मधुकर मोरे यांनी केले.