नांदेड | आजच्या धावपळीच्या जगात प्रामाणिकपणा हा दुर्मिळ होत चालला असला तरी नांदेडमध्ये एका ऑटो रिक्षा चालकाने दाखविलेल्या सचोटीने समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे.


९ सप्टेंबर रोजी दुपारी ४:३० वाजता टायगर ऑटो रिक्षा चालक संघटनेचे सदस्य शेख सुफियान रफिक (राहणार फारुख नगर, नांदेड) आपल्या रिक्षामध्ये प्रवासी भगवानराव मारोतराव पतंगे (रा. येळेगाव, ता. कळमनुरी, जि. हिंगोली) यांना घेऊन गेले. प्रवासादरम्यान प्रवाशांचा ₹17,000 किमतीचा मोबाईल रिक्षात राहून गेला.

लक्षात येताच भगवानराव यांनी चौकशी केली असता संघटनेचे सदस्य शेख अहमद यांनी तात्काळ सुफियानशी संपर्क साधला. सुफियान यांनी मोबाईल सुरक्षित असल्याचे सांगत तो परत करण्याची तयारी दर्शविली.


ही माहिती टायगर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अहेमद (बाबा) यांच्याकडे देण्यात आली. त्यांनी वाहतूक पोलीस निरीक्षक साहेबराव गुट्टे व वजीराबाद पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या उपस्थितीत मोलाना अबुल कलाम आझाद ऑटो रिक्षा स्टॅण्ड येथे प्रवासी भगवानराव पतंगे यांना त्यांचा मोबाईल परत केला.

या वेळी टायगर संघटनेचे पदाधिकारी व सदस्य संदीप राठोड, शेख अहमद, शेख इसाक, ठाकूर, डुकरे पाटील, नासेर खान, सावकार यांच्यासह पोलिस अधिकारी उपस्थित होते. शेख सुफियान यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

