हिमायतनगर, जांबुवंत मीराशे | रयतेचे राज्य आणि बहुजन प्रतिपालक म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज घरोघरी उत्साहात साजरी केली जात आहे. मात्र आजच्या तरुणांनी राजेंना केवळ डोक्यावर घेण्यापेक्षा त्यांचे विचार आचरणात आणण्याची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. गफार कार्लेकर यांनी केले.

तालुक्यातील कारला येथे आयोजित शिवजन्मोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलताना डॉ. कार्लेकर म्हणाले की, आज प्रत्येकाला शिवाजी जन्माला यावा असे वाटते. परंतु त्यासाठी आधी राजमाता जिजाऊ यांसारखी माता घडली पाहिजे. महिलांनी केवळ उपवास किंवा पारायण न करता आपल्या पाल्यांना दर्जेदार शिक्षणासोबत चांगले संस्कार दिले, तरच खऱ्या अर्थाने समाजात शिवाजी घडू शकतील.


तरुणांनीदेखील छत्रपतींना डोक्यावर घेण्यापेक्षा त्यांच्या विचारांना डोक्यात स्थान द्यावे, हीच खरी शिवजयंती ठरेल, असे ते म्हणाले. यावेळी सरपंच गजानन पाटील कदम, पोलीस पाटील साईनाथ कोथळकर, आकाश मोरे, भाऊराव मोरे, अविनाश पाटील लुम्दे, गणराज पाटील, शिवम मिरासे, वसंत मिरासे, आनंदराव सूर्यवंशी यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.



