Anna Bhau Sathe | अण्णा भाऊ साठे वैश्विक भान असलेले लेखक -डॉ. गिरीश मोरे यांचे प्रतिपादन -NNL
नांदेड| वाचक म्हणून आपण आपल्या मनाचा सैलपणा वाढवायला हवा. जातीच्या, प्रदेशाच्या संकुचित गोष्टीतून आपण बाहेर पडलो तर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे व्यापकत्व लक्षात येईल. त्यांच्या अनुभूतीचा परीघ अत्यंत विस्तृत होता. विशिष्ट विचारसरणीत अण्णा भाऊ साठे कधीही अडकून पडले नाहीत. त्यांच्या साहित्यातला माणूस विशिष्ट जातीचा नाही, धर्माचा नाही. कारण अण्णा भाऊ साठे हे वैश्विक भान असलेले प्रतिभावंत लेखक होते. असे प्रतिपादन कोल्हापूर येथील ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गिरीश मोरे यांनी केले.
प्रतिभावंत साहित्यिक, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र, विद्यार्थी विकास विभाग आणि विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या ‘साहित्य संवाद’ या कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान...
