नांदेड, प्रतिनिधी | प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी गुरुवार (दि. ३० जुलै २०२६) रोजी दुपारी १ वाजता जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार नांदेड जिल्ह्यासाठी दुपारी ४ वाजेपर्यंत रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.


या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व शासकीय यंत्रणांना सतर्क राहून आवश्यक ती उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच नागरिकांनीही सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाळावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.


जिल्ह्यातील कमी उंचीच्या पुलांवर दीड ते दोन फूट पाणी वाहत असल्यास अशा पुलांवरून पायी किंवा वाहनाने जाण्याचे धाडस करू नये. नदी, नाले आणि धबधब्यांजवळील पर्यटनस्थळांवर सुरक्षित अंतर राखावे तसेच प्रशासनाने निश्चित केलेल्या मर्यादेपलीकडे जाऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.



नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे सांगत, नियमांचे उल्लंघन करून स्वतःचा किंवा इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर पोलिस विभागामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत हवामान सूचना आणि प्रशासनाच्या निर्देशांवरच विश्वास ठेवावा तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रशासनाला तातडीने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

