नांदेड, अनिल मादसवार| जिल्ह्यात सरासरीपेक्षा तब्बल ७५ टक्के कमी पाऊस झाल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी प्रहार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.



यासंदर्भात प्रहार सामाजिक संघटनेचे जिल्हा प्रमुख मिलिंद कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात पावसाने मोठी ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली आहेत. पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी पिके करपण्याच्या मार्गावर आहेत.



पावसाची स्थिती अत्यंत गंभीर असून शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पिकांचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी, तसेच जिल्हा कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करून शासनाच्या सर्व सवलती व उपाययोजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.



या निवेदनावर प्रहार सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व विविध तालुकाध्यक्षांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यात नांदेडचे महानगराध्यक्ष प्रीतपाल सिंह साहू, हिमायतनगरचे दत्ता देशमुख सरसमकर, हदगावचे अनिल पाटील कदम, उमरीचे चक्रधर हंबर्डे, कंधारचे गंगाधर मोरे, अर्धापूरचे संतोष चाभरेकर, धर्माबादचे बालाजी साबळे, आदी तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे निवेदनावरून दिसून येते. शेतकऱ्यांच्या नुकसानीची तातडीने दखल घेऊन प्रशासनाने ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

