हिमायतनगर | अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्याची स्थापना होऊन तब्बल २७ वर्षे उलटली, मात्र शहरातील पोलीस कॉलनीजवळील हिंदू स्मशानभूमी आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. विशेष म्हणजे, येथे अद्याप वीज व्यवस्था नसल्याने रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात करावे लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.


स्मशानभूमीसारख्या अत्यंत संवेदनशील ठिकाणी वीजेसारखी मूलभूत सुविधा उपलब्ध नसणे ही प्रशासनाच्या उदासीनतेचे उदाहरण असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नगरपंचायतीने तातडीने वीज जोडणी करून आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.


यासोबतच विद्यमान आमदार, माजी आमदार, खासदार आणि सर्व पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राजकारणापलीकडे जाऊन या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, निधी उपलब्ध करून स्मशानभूमीतील वीज, पिण्याचे पाणी, अंतर्गत रस्ता आणि इतर मूलभूत सुविधा तातडीने पूर्ण कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.



सामाजिक युवा कार्यकर्ते आकाश पाटील यांनी या विषयावर सोशल मीडियावर केलेली रोखठोक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. “राजकीय कार्यक्रमांमध्ये उपस्थिती लावण्यापेक्षा नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य द्या. शेवटी प्रत्येकाला याच ठिकाणी यायचे आहे,” असा त्यांनी उपस्थित केलेला सवाल अनेकांच्या मनाला भिडत असून, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी यावर तातडीने भूमिका घ्यावी, अशी मागणी आता अधिक तीव्र होत आहे.

