नांदेड (प्रतिनिधी) सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर शाहु सभागृह दादर मुंबई येथे आज प्रत्यक्ष कारगिल युध्दात सहभागी झालेल्या नांदेडच्या कॅप्टन प्रकाश नारायण कस्तुरे यांचा गौरव करण्यात आला.


मुळचे औसा येथील रहिवाशी असलेल्या प्रकाश नारायणराव कस्तुरे यांचे शालेय शिक्षण बिलोली येथे झाले. बालपणापासून देशभक्तीची भावना, शाळेमध्ये सैनिक दिवसासाठी घेतलेला पुढाकार यामुळे बालपणापासूनच सैन्यात जावे अशी त्यांची इच्छा. आर्मीमध्ये जाण्यासाठी शालेय शिक्षणानंतर त्यांनी आयटीआय केले आणि मोटार मेकॅनिकचा डिप्लोमा केला. त्यानंतर १९७५ मध्ये सैन्य दलात टेक्निशयन म्हणून संधी मिळाली.


चांगल्या कामाच्या जोरावर त्यांना सैन्य दलात प्रवेश मिळाला. पंजाब, राजस्थान, अरुणचल प्रदेश, काश्मिर, आंध्रप्रदेश अशा विविध राज्यात त्यांना जावे लागले. त्यानंतर प्रत्यक्ष कारगिल युध्दा त्यांनी सहभाग नोंदविला. त्यावेळचे अनुभव कथन करताना ते म्हणाले की, कारगिल पहाडीवरुन पाकिस्तानी सेनेने भारतावर हल्ला केला त्यात सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे पाकिस्तानी सैन्य हे उंचावर होते.



त्यात भारतीय सैनिकांनी पायथ्यावरुन पाक सैनिकांना भंडावून सोडले आणि कारगिल टेकड्यावरुन पाक सैनिकांना भारतीय सैनिकांनी अखेर पळवून लावले. याचा साक्षीदार होण्याची मला संधी मिळाली. भयावह परिस्थितीत काम करताना त्यावेळी केलेला संघर्ष हा महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. ३० वर्ष सैन्य सेवेत व्यथित केल्यानंतर आपला मुलगा सुभेदार श्याम प्रकाश कस्तुरे जो सध्या लेह लद्दाख येथे कठीण परिस्थितीत भारतीय सिमेवर कार्यरत आहे.
शासनस्तरावरुन वेगवेगळी अकरा पदके देवून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. जीवन गौरव पुरस्कारानेही त्यांचा सन्मान झाला आहे. देशाचा सर्वोत्कृष्ट विशेष सेवा राष्ट्रपती पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. पत्नी ज्योतीताई कस्तुरे यांची मिळालेली साथ व मुलांनी दिलेले पाठबळ या हिमतीवर त्यांनी भारतीय सैन्य दलात केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. ए मेरे वतन के लोगो जरा आंखो भर लो पाणी हे गीत ऐकल्यानंतर त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात आणि कारगिलच्या आठवणी जाग्या होतात. आज मुंबई येथे सैनिक फेडरेशनच्या वर्धापन दिनानिमित्त व कारगिल दिनानिमित्त आज छत्रपती शिवाजी महाराष्ट्र नाट्यमंदिर शाहु सभागृह दादर येथे त्यांचा सैनिक रत्न पुरस्कार म्हणून गौरव करण्यात आला. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

