
नांदेड। नायगांव विधानसभा मतदारसंघासह नांदेड जिल्ह्यात गत दोन-तिन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून याबाबत तातडीने पहाणीसह नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश नांदेडचे जिल्हाधिकारी यांना द्यावेत असे साकडे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गिरीष महाजन यांना भाजपा नेते बालाजी बच्चेवार यांनी निवेदनातून घातले आहे.


नांदेड जिल्ह्यातील गत तिन दिवसात मोठ्या प्रमाणात संततधार पावसाने झालेली व संभाव्य आपत्ती निवारणासाठी पालकमंत्री ना.गिरीष महाजन यांना आज तातडीने ई-मेल द्वारे निवेदनातून भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी बच्चेवार यांनी लक्ष वेधले आहे. गत दोन ते तिन दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात मूख्यत्वे नायगांव विधानसभा मतदारसंघात संततधार पाऊस सुरु आहे.परंतू,जिल्हा प्रशासनाकडून या ठिकाणी पर्जन्यमान कमी असल्याचा निष्कर्ष काढण्यात येत आहे.

गत काही वर्षातील परिस्थिती पहाता अत्यल्प पावसातही या मतदारसंघातील नायगांव (खै.), धर्माबाद व उमरी या तिन्ही तालुक्यातील नद्या,नाले व ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पुर आलेले आहेत.तसेच, शेतीपिकांसह पशुंचीही मोठी हानी झालेली आहे.येथिल दळणवळण व दैनंदिन जीवन ठप्प झालेले आहेत.आज शेतकरी बांधवांचा महत्वाचा सण बैलपोळा असून प्रशासनाने त्यादृष्टीने योग्यतेने उपाययोजना केलेल्या नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.


गत कांही वर्षात व यंदाही नैसर्गिक आपत्तीत येथिल शेतकरी त्रस्त बनला असून त्यांच्यासह येथिल जनतेला दिलासा देण्यासाठी आपण तातडीने स्वतः लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली असल्याने याप्रकरणी स्वतः लक्ष देऊन आपल्या नायगांव विधानसभा मतदारसंघासह नांदेड जिल्ह्य़ातील सद्यास्थित नैसर्गिक परिस्थितीचा वेळोवेळी आढावा घेण्यासह संभाव्य धोका टाळण्यासाठी उपाययोजना करण्यासह येथिल नैसर्गिक आपत्तीची पहाणी व पंचनामे करुन आपत्तीग्रस्तांना तातडीची मदत देण्याचे आदेश नांदेडचे जिल्हाधिकारी यांना द्यावेत अशी विनंती पालकमंत्री ना.गिरीष महाजन यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातून बालाजी बच्चेवार यांनी केली आहे.

या निवेदनाच्या प्रति माहितीस्तव भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावणकुळे यांना तर,प्रतिलीपीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व अजितदादा पवार,राज्याचे मुख्य सचिव, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त यांच्यासह प्रतिलिपी माहिती व योग्य त्या कार्यवाहीस्तव नांदेडचे जिल्हाधिकारी, बिलोली व धर्माबादचे उपविभागीय अधिकारी आणि नायगांव (खै.), उमरी व धर्माबादच्या तहसीलदार यांनाही पाठविल्या असल्याचे बालाजी बच्चेवार यांनी सांगितले.



