नांदेड। नांदेड शहर व परिसरात गुन्हेगारांनी पुन्हा डोके वर काढले यातून तीन जणांमध्ये वाद होऊन एकाने दुसऱ्यावर गोळीबार केला. या घटनेत एक जण ठार झाला तर अन्य एक गंभीर जखमी झाला आहे. वसरणी येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळ रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असल्याने एकच खळबळ उडाली आहे.


रविवार दि.११ मे रोजी सकाळी पुन्हा एकदा गोळीबार झाल्याने नांदेड शहर हादरले आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आशु पाटील उर्फ कमलेश लिंबापुरे याच्यासह शेख परवेज, तेजासिंग बावरी या तिघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. प्रारंभी सुरू झालेला किरकोळ हा वाद टोकाला गेल्याने कमलेश लिंबापुरे उर्फ आशु पाटील याने शेख परवेज व तेजासिंग बावरी यांच्यावर गोळी झाडली.

यात शेख परवेज (वय २५ वर्ष) हा जागीच ठार झाला तर त्याच्यासोबत असलेला तेजासिंग बावरी हा जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी घटनास्थळाला भेट दिली असून, या गोळीबारात जखमी झालेल्या तेजासिंग बावरी याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन महिन्यापूर्वीच नांदेड शहरातील गुरुद्वारा परिसरात घडलेल्या गोळीबाराची चर्चा थंडावत असताना आज पुन्हां गोळीबार झाल्याने नांदेड शहर कधी गुन्हेगारी मुक्त होणार असा प्रश्न पुढे आला आहे.
