नांदेड, प्रतिनिधी| शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प सध्या ९७ टक्के क्षमतेने भरला असून पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


पूर नियंत्रण विभागाच्या माहितीनुसार, सोमवारी (दि. ३ ऑगस्ट) रात्री १०.३० वाजता विष्णुपुरी बंधाऱ्याचा एक दरवाजा उघडून ४५८ क्युमेक (१६,१७३ क्युसेक) पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.


या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात जाणे टाळावे तसेच पशुधन, मालमत्ता, वीटभट्ट्या व इतर साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



पूर नियंत्रण अधिकारी यांनी प्रशासनाला नदीकाठच्या गावांमध्ये तातडीने सूचना देऊन आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

