नांदेड | शहराच्या मध्यभागी असलेले बहुचर्चित नांदेड विमानतळ एमआयडीसीच्या निष्काळजीपणामुळे बंद पडले असून, यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत थेट जबाबदार असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे महानगर प्रमुख प्रकाश मारावार यांनी केला आहे.


मारावार म्हणाले की, अनेक वर्षे नांदेड विमानतळ रिलायन्स समूहाच्या ताब्यात होते. परंतु, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हट्टापायी विमानतळाचा कारभार रिलायन्सकडून काढून घेऊन अनुभव नसलेल्या एमआयडीसीकडे दिला.

🔹 एमआयडीसीचा शून्य अनुभव
मारावार यांनी आरोप केला की, एमआयडीसीच्या गलथान कारभारामुळे अनेक मोठे उद्योगधंदे आधीच बंद पडले आहेत. अधिकारी भूखंडांच्या दलालीत मश्गूल असताना, विमानतळ चालवण्याचा अनुभव नसताना त्यांच्याकडे ताबा दिल्यामुळे विमानतळ “खड्ड्यात” गेला.


🔹 धावपट्टीवर भेगा – प्रवासी हैराण
नांदेड विमानतळावरून दररोज जवळपास ५०० प्रवासी जगप्रसिद्ध गुरुद्वारा, माहूरगडची रेणुका माता दर्शनासाठी तसेच आजूबाजूच्या चार जिल्ह्यांमधील दळणवळणासाठी प्रवास करत होते. अचानकपणे धावपट्टीला भेगा पडल्याचे कारण सांगून विमानतळ बंद करण्यामागे संशयास्पद कारस्थान असल्याचे मारावार यांनी म्हटले.

🔹 “दाल में कुछ काला है”
मारावार म्हणाले, “धावपट्टीवर भेगा पडत असताना MIDC झोपली होती का? अचानक विमानतळ बंद करण्यामागे उद्योगमंत्र्यांचा वेगळाच डाव दिसतो. नांदेड विमानतळ परत कोणाच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट दिसते.”
यामुळे नांदेडसह संपूर्ण मराठवाड्याच्या दळणवळणाच्या विकासाला मोठा अडथळा निर्माण झाला असून, यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत थेट जबाबदार असल्याचा आरोप प्रकाश मारावार यांनी केला आहे.

