हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील पैनगंगा नदीकाठच्या गावांत आणि शेतीत पाणी शिरून झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी रविवारी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी विविध गावांना भेट दिली. यावेळी त्यांनी शेतातील नुकसानीची पाहणी करत पूरग्रस्त नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. आणि प्रशासनाच्या वतीने तातडीने मदत मिळावी यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.



इसापूर धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग आणि दोन दिवस झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे कामारी, जवळगाव, घारापुर, खडकी, टेम्भूर्णी, विरसनी, दिघी, हिमायतनगर, पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली, धानोरा, बोरगडी, कोठा, एकंबा, वारंगटाकळी, मंगरूळ, कार्ला, सिबदरा, खैरगाव, वडगाव, सवना, सरसम, आदी गावांसह नदी-नाल्यांच्या काठावरील अनेक शेतीत आणि घरात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे. सर्व नागरिकांना सुखरूप बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून, आपत्ती व्यवस्थापन समिती व अधिकाऱ्यांना तातडीने मदत व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.


असे असले तरी तात्काळ शेतकऱ्यांना व नुकसानग्रस्त नागरिकांना मदत मिळावी यासाठी कामारी, जवळगाव, घारापुर, खडकी, टेम्भूर्णी, विरसनी, दिघी, हिमायतनगर, पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली, पूरग्रस्त भागाचा आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी रविवारी दौरा केला. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या विविध समस्या व अडचणी मांडल्या. प्रशासनाच्या वतीने तातडीने मदत मिळावी यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले.



यावेळी कामारी, विरासनी सह काही गावातील सहस्रकुंड धरण विरोधी संघर्ष समितीच्या नागरिकांनी मदार महोदयांना प्रहसन विचारले. त्यांनी मांडलेल्या प्रश्नांना आमदार कदम यांनी उत्तर देत शंका निरसनाचा प्रयत्न केला. तसेच, संबंधित प्रकल्पांबाबत लवकरच हिमायतनगर येथे जिल्हाधिकारी आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विशेष बैठक आयोजित केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पाहणी दरम्यान मोठ्या संख्येने नुकसानग्रस्त नागरिक, शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.


धरण प्रकल्पामुळे आमची आणखी दुर्दशा होईल – प्रकल्प रद्द करा
अलीकडील ढगफुटी आणि धरणातील पाण्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. घरात पाणी शिरून मालमत्ता व शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या परिस्थितीत नागरिकांनी धरण बहुउद्देशीय प्रकल्पाविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. कामारीसह परिसरातील नागरिकांनी सांगितले की, “आज कोणतीही भिंत नसताना एवढं पाणी गावात शिरलं, मग जर धरणाची भिंत बांधली तर आमच्या गावात पाणी कुठवर जाईल याचा कोणालाच अंदाज नाही. त्यामुळे जनतेची आणखी मोठी दुर्दशा होणार आहे. यावर विचार करून धरण रद्द करा अशी मागणी अनेक शेतकऱ्यांनी केली.
