
नांदेड| महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी आज संसदेत महाराष्ट्रातील टियर-२ व टियर-३ शहरांसाठी ‘पीएम ई-बस सेवा’ योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक बसेस मागणी केली. या योजनेच्या पुढील टप्प्यात ३ लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या जास्तीत जास्त शहरांना बसेस उपलब्ध करून देण्याचा केंद्र सरकारचा मनोदय असल्याचे केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी उत्तरादरम्यान स्पष्ट केले.


राज्यसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात ‘पीएम ई-बस सेवा’ योजनेबाबत आज झालेल्या चर्चेत सहभागी होताना खा. अशोकराव चव्हाण यांनी या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात ३५ हजार इलेक्ट्रिक बसेसचे वितरण करण्याच्या केंद्र सरकारच्या घोषणेचे स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या योजनेमुळे नागरिकांना माफक दरात पर्यावरणपूरक प्रवास करता येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

ते पुढे म्हणाले की, मोठ्या महानगरपालिकांकडे आर्थिक स्रोत मुबलक असल्याने त्यांना शहर बससेवा प्रभावीपणे राबवणे शक्य होते. मात्र, लहान महानगरपालिकांचे आर्थिक स्रोत मर्यादित असल्यामुळे त्यांना ही सेवा सुरू करण्यात अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर, ३५ हजार इलेक्ट्रिक बसांचे वितरण करण्याचे उद्दिष्ट असलेल्या ‘पीएम ई-बस सेवा’ योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील टियर-२ व टियर-३ शहरांना अधिकाधिक बस देण्यासाठी स्वतंत्र विचार केला जाणार आहे का, असा प्रश्न खा. अशोकराव चव्हाण यांनी उपस्थित केला.


यावर उत्तर देताना केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर म्हणाले की, या योजनेत जास्तीत जास्त शहरांचा समावेश करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. मात्र, दुसऱ्या टप्प्याचे निकष अद्याप निश्चित झालेले नाहीत. अंतिम निकष ठरल्यानंतर राज्य सरकारांनी आपले प्रस्ताव व सूचना पाठवाव्यात. त्यानुसार आवश्यक त्या सुधारणा करण्याबाबत त्यांनी अनुकूलता व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ ऑगस्ट २०२३ रोजी पीएम ई-बस सेवेचा प्रारंभ केला होता. पहिल्या टप्प्यात २०२७ अखेरपर्यंत देशभरातील ११६ शहरांमध्ये १० हजार बसेसचे वितरण होणार असून, त्यानंतर ३५ हजार बसेसच्या दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी सुरु होईल, अशीही माहिती केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी यावेळी दिली.



