हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीकाठावरील मौजे वारंग टाकळी येथे पुन्हा एकदा वन्यजीवांच्या हालचालींमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल रात्री शेतकरी अशोक लक्ष्मण हाके यांच्या शेतात बिबट्याने घुसून वगारीचा फडशा पाडला. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात भीतीचे सावट पसरले आहे.


घटनास्थळी पावलांचे ठसे व प्राण्याच्या अवशेषांवरून बिबट्याच्या उपस्थितीची खात्री झाली असून, गावकऱ्यांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान, वारंग टाकळी आणि आसपासच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांनीही सुरक्षेची चिंता व्यक्त केली आहे.



गावकरी व शेतकरी वर्गाने वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, परिसरात पिंजरे लावावेत आणि पहारा वाढवावा अशी मागणी केली आहे. तसेच नुकसानग्रस्त शेतकरी अशोक हाके यांना योग्य ती आर्थिक मदत व भरपाई देण्यात यावी, अशीही मागणी होत आहे. वनविभागाने तातडीने तपास करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी स्थानिकांची अपेक्षा आहे.




