हिमायतनगर,अनिल मादसवार | हिमायतनगर तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसाने आता आणखी रौद्ररूप धारण केले आहे. शुक्रवार (दि. 26 सप्टेंबर) रोजी दुपारी दोन ते तीन वाजेदरम्यान झालेल्या अतिवृष्टीसदृश्य पावसामुळे पारडी शिवारातील शेतकरी राजू विठ्ठल रौतुलवाड यांच्या गट क्र. 84 मधील शेतशिवारातील आखाड्यावर सात म्हशी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली. शनिवारी सकाळपासून पावसाचा जोर सुरूच आहे.



जनावरे वाहून गेल्याचे समाजताच स्थानिकांनी केलेल्या शोधाशोध नंतर सहा म्हशी सुखरूप आढळून आल्या आहेत, मात्र एक म्हैस अजूनही बेपत्ता असून, येथील आणखी एक शेतकरी सदनानंद निम्मालवाड यांचे दोन बैल वाहून गेला असून, सुखरूप सापडले आहेत. वाहून गेलेल्या म्हशीचा प्रशानाकडून शोध कार्य सुरु असल्याचे तलाठी यांनी सांगितले आहे. एकूणच अतिवृष्टीच्या पावसाने मोठे नुकसान झाले असून या घटनेमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.



यंदाच्या अतिवृष्टीमुळे हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. जनावरे वाहून गेल्याने त्यांचे हाल आणखीनच वाढले आहेत. शासनाने तातडीने हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी तसेच जनावरे वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.




