नांदेड| बहिण भावाच्या पवित्र बंधनाचा सण रक्षाबंधन शनिवारी ता.९ पारंपारिक पद्धतीने सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. रक्षाबंधन चे औचित्य साधून नांदेड जिल्ह्यातील पेनुर येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनींनी टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ राख्या तयार केल्या आहेत. या राख्या पर्यावरण पूरक असल्यामुळे या राख्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या राख्या विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील वेगवेगळे कागद, तुकडे, रंग, कापड, कापूस, धान्य तांदूळ, गहू, विविध दाळी, मका, आईस्क्रीमच्या टाकाऊ काड्या, शर्ट चे बटन, टेलरिंगचे उरलेले कापड, अशा विविध वस्तूंपासून विद्यार्थ्यांनी या राख्या तयार केल्या आहेत.
नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील पेनुर येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या गाईडच्या विद्यार्थिनींनी शाळेचे मुख्याध्यापक प्रलोभ कुलकर्णी, शिक्षक मारुती सोने, शिक्षक मुरलीधर ढगे , शिक्षिका मीनाक्षी गोखंडे, मदन गवते,चंद्रकांत एडके, गोवर्धन गवते,एजगे,राम पाटील गवते,प्रकाश आगलावे यांच्या मार्गदर्शनाखाली हा अनोखा पर्यावरण पूर्वक राख्यांचा उपक्रम राबवीत समाजामध्ये जनजागृतीचा संदेश दिला आहे.
रक्षाबंधनासाठी बाजारपेठेत अनेक प्रकारच्या फॅन्सी तसेच आकर्षक अशा राख्या विक्रीसाठी आलेल्या पाहायला मिळतात आणि त्या खरेदीसाठी मोठी गर्दीही होत असते. रक्षाबंधनाच्या दिवशी पारंपारिक पद्धतीने औक्षण करून आपल्या लाडक्या भाऊरायाला राखी बांधली जाते. परंतु बाजारातील अनेक राख्यांमध्ये पर्यावरणाचा नाश करणाऱ्या प्लास्टिकच्या राख्यांचा वापर केला जातो. याच गोष्टीला छेद देत जिल्हा परिषद शाळा पेनुर येथील गाईडच्या विद्यार्थिनींनी आपल्या शिक्षक वृंदांच्या मार्गदर्शनानुसार पर्यावरण पूरक तसेच टाकाऊ पासून टिकाऊ , राख्यांची योजना राबविली आहे.

विशेष म्हणजे या राख्यांच्या धाग्यावर विविध सामाजिक संदेश देण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने झाडे लावा झाडे जगवा,पाणी बचत, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता, मतदान जनजागृती, शिक्षणाचे महत्त्व, लेक वाचवा लेक शिकवा, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, प्लास्टिक मुक्ती,पर्यावरण विषयक, देश भक्ती यासह अनेक असे महत्त्वाचे सामाजिक संदेश याद्वारे देण्यात आले आहेत.

गाईडच्या विद्यार्थिनींनी तयार केलेल्या या पर्यावरण पूरक राख्या त्यांनी गुरुवारी ता.७ रोजी जिल्हा परिषद येथे येत मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, शिक्षणाधिकारी प्राथमिक वंदना फुटाणे, शिक्षणाधिकारी योजना दिलीप बनसोडे, अधीक्षक शापोआ नीळकंठ पाचंगे, कक्ष अधिकारी राघवेंद्र मदनुरकर, शुभम तेलेवार, गाईड जिल्हा संघटक माधुरी जवाणे आदींच्या उपस्थितीत वडाच्या झाडाला राखी बांधून वृक्ष संगोपन करण्याची प्रतिज्ञा घेतली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी विद्यार्थिनींच्या स्तूत्य उपक्रमाचे स्वागत करीत कौतुक केले.

या राख्या तयार करण्यासाठी शाळेतील स्नेहल जावळे, राजनंदा मुरडे, सुनंदा अचमारे, आशा भालेराव, प्रियंका कराळे, अनुसया चिल्कावार,लक्ष्मीबाई कोकणे, सुजाता कदम, सुरेखा सगर, विठ्ठल नरमिटवार, विश्वनाथ लिंबूरकर, केशव चव्हाण, जयवंत क्षीरसागर, अनुप कंदुलवार, नामदेव कोतवाल, आदींचे सहकार्य लाभले.

