Wednesday, May 13

Agriculture News: शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे

Low-cost innovative technology in agriculture मुंबई| मानव विरहित शेती, ‘ए आय’ आधारित हवामानाचे अंदाज व हवामान अनुकूल पीक पद्धती घेणे, काटेकोर सिंचन पद्धती विकसित करणे, जिल्हास्तरावर शेती प्रयोगशाळा उभारणे, शेतीसाठी मोबाईल व्हॅनची सोय करणे, पीक साठवणूक सुविधा वाढवणे, शेतीसाठी कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रद्यान वापरून, उत्पादन वाढवून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करण्यावर शासनाचा भर आहे, असे मत कृषीमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केले.

यशवंतराव चव्हाण सभागृह येथे दि. १ जुलै २०२५ रोजी स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कृषी दिनानिमत्ताने ‘महाकृषी ए. आय. धोरण या विषयावर’ कृषी विभागातर्फे कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल, प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, नानाजी कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक परिमल सिंह यावेळी उपस्थित होते.

कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हिताच्या शासन अनेक योजना राबवत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड शेतीला दिली जावी यासाठी महाकृषी ए. आय. धोरण शासन राबवत आहे. काळाची गरज ओळखून शेतीमध्ये बदल होणे अपेक्षित आहे. शेतीतील उत्पादन वाढले आहे मात्र शेत मालाची गुणवत्ता कायम राखणे हे मोठे आव्हान आहे. फक्त भरमसाठ खत वापरणे हा जास्त उत्पादन देण्याचा मार्ग नाही. पिकाला जे आवश्यक तीच खत, योग्य पाणी याची मात्रा देणे आवश्यक आहे.

कृषीमध्ये अनेक बदल अपेक्षित आहेत. शेतकऱ्यांना काळानुरुप प्रशिक्षण देणे, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे. शेतकरी केंद्रित योजना, शाश्वत विकासच्या योजना राबवणे यावर शासन भर देत आहे. शेतमालाला योग्य हमी भाव मिळवून देणे हेच शासनाचे धोरण आहे असेही ॲड. कोकाटे म्हणाले.

कृषी विभागातर्फे महाकृषी ए. आय. धोरण कार्यशाळेचा शुभारंभ 2 Agriculture News: शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार - कृषीमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे

शेतकऱ्यांना समृद्ध करणारे निर्णय : कृषी राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल
शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी शासन अनेक महत्वपूर्ण निर्णय घेत आहे. शेतकऱ्यांना शेती नुकसानीसाठी सरसकट मदत देण्यात येत आहे. शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक करणे, महाकृषी ए. आय. धोरणाची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. शेतीमध्ये आज अनेक आव्हाने आहेत शेतमालाला योग्य बाजारभाव आणि बाजारपेठांची योग्य माहिती असणे आवश्यक आहे, असे कृषी राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी सांगितले.

प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी म्हणाले की, महाकृषी ए. आय. धोरण या विषयी आज शेतकऱ्यांशी सवांद साधता येईल. शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी प्राधान्यक्रम ठरवता येईल. मातीची गुणवत्ता तपासणे, खतांचा योग्य वापर, हवामान ते बाजारपेठ पर्यंत अचूक पद्धतीने शेती करणे यावर भर देण्यात येत आहे. जेणेकरून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढून शेतकरी समृद्ध होईल, असे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी सांगितले. प्रास्ताविक कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी केले. यावेळी महाकृषी ए. आय. धोरणाचे माहितीपत्रक मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!