Wednesday, May 13

Drizzling rain everywhere in Himayatnagar taluka | हिमायतनगर तालुक्यात चौथ्या दिवशी देखील सर्वदूर रिमझिम पाऊस; सुर्य दर्शन नाही; शेती कामे खोळंबली – NNL

हिमायतनगर, दत्ता शिराणे| नांदेड जिल्ह्यासह हिमायतनगर तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरूच आहे. या पावसामुळे खरिपाच्या पिकांना जीवनदान मिळाले असून, खरिप पेरणीतील कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी, ही पिके बहरात आली आहेत. तालुक्यात सध्यातरी पिक परीस्थिती बर्‍यापैकी दिसून येत असली तरी शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. दरम्यान सर्वदूर सुरु असलेल्या रिमझिम पावसामुळे शेतीकाम खोळंबली असल्याचे दिसून येत असून, तालुक्यात आजपर्यत ३८३.७० मी. मी. पाऊस झाला आहे.

हिमायतनगर तालुक्यात ४९ हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर भौगोलिक क्षेत्र असून पेरणी क्षेत्र ३९ हजार चारशे चौर्हेचाळीस आहे. यावर्षी कपाशीचा पेरा घटला असून, नगदी पीक सोयाबीनचा पेरा प्रकर्षानं वाढला आहे. १ जून ते ३१ ऑक्टोबर या दरम्यान तालुक्यात ८६७. ३० मी. मी. पाऊस सरासरी अपेक्षित आहे. मात्र यावर्षी रोहिण्या संपूर्णतः कोरड्या गेल्या आणी मोसमातील मृग नक्षत्र कोरडेच राहीले. आद्रा नक्षत्रातील पावसावर खरीपाच्या पेरण्या पुर्णत्वास आल्या. पेरणी केल्यानंतर पिकांना चांगल्या प्रकारे पावसाची साथसंगत मिळाली. अखेर दुबार पेरणीची नौबत टळली. मध्यम स्वरूपाच्या पावसावर खरिपाच्या पेरणीतील पिकांची अवस्था सध्यातरी बर्‍यापैकी दिसून येत आहे.

तूर्तास जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न मिटला म्हणण्यास वाव आहे. आजपर्यंतच्या पावसाळ्यात ३८३ मी. मी. पाऊस झाला असून, सध्याला गेल्या चार दिवसांपासून हिमायतनगर शहर व तालुक्यात रिमझिम पाऊस सुरु आहे. गुरूवार दिनांक २५ पर्यत जवळपास चार दिवसाच्या रिमझिम पाऊस अंदाजे ४०. ६० मी. मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्याला मध्यम स्वरूपाचा होताणारा पाऊस खरिपाच्या पेरणीतील पिकांना पोषक मानला जात आहे. सध्याला ओढ्या नाले प्रवाहित झाले असले तरी मोठ्या जोरदार पावसाची प्रतिक्षा कायम लागूनच आहे.

दि.२६ सकाळच्या वेळी पावसाने थोडी उसंत दिली आणि पुन्हा दुपारी पावसाळा सुरुवात झाली आहे. आकाशातील काळे ढग मात्र आपली रग धरून असून, मोठा पाऊस होईल अशी अपेक्षा सर्वाना आहे. तालुक्यात आजपर्यंत झालेला पाऊस हा अत्यल्प प्रमाणात असून, गेल्या वर्षी आज पर्यत ३७३ मी. मी. पाऊस झाला होता. या वर्षी मात्र थोडे बहुत प्रमाणात का होईना? पावसाची टक्केवारी पुढे सरकली आहे. यावर्षी अल्प पावसावर खरिपाच्या पेरणीतील पिके सुस्थितीत दिसत असली तरी हंगाम बऱ्यापैकी पदरात पडला तरी येणार्‍या उन्हाळ्यात होणारी भिषण पाणी टंचाई व रब्बी हंगामाला मुकावे लागेल याची चिंता शेतकऱ्यांना लागून आहे. इतक्यात झालेल्या व होत असलेल्या पावसावर शेतकरी तूर्तास समाधान मानत असले तरी आगामी काळाची भिषणत्ता मात्र शेतकऱ्यांच्या वर्मी घाव घालणारी ठरत असून या भागात जोरदार पावसाची प्रतिक्षा सर्वानाच लागून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!