नांदेड | जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार येथे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा अखेर बारड पोलिसांनी उलगडा केला आहे. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे आलेल्या नैराश्यातून पोटच्या दोन मुलांनीच आपल्या आई-वडिलांचा गळा दाबून खून केला आणि त्यानंतर मुगट रेल्वेस्थानक परिसरात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.


दि. २५ डिसेंबर रोजी सकाळी मुगट रेल्वेस्थानक परिसरात जवळा मुरार येथील उमेश रमेश लखे (२५) व बजरंग रमेश लखे (२२) या दोन तरुणांचे मृतदेह रेल्वेखाली आढळून आले होते. तर त्यांचे वडील रमेश होनाजी लखे (५५) व आई राधाबाई रमेश लखे (४८) यांचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरात जवळा मुरार येथे आढळून आले होते. सदर घटना दि. २४ डिसेंबरच्या मध्यरात्री घडली असून दुसऱ्या दिवशी सकाळी ती उघडकीस आल्याने संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली होती.

ही घटना घात आहे की आत्महत्या, याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अविनाश कुमार व अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी घटनास्थळी भेट देत सर्व बाजूंनी सखोल तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या.


तपासादरम्यान गावातील माहिती, मुगट रेल्वेस्थानक परिसरातील प्रत्यक्षदर्शींची साक्ष, घरातील पुरावे तसेच वैद्यकीय अहवाल यांच्या आधारे असे स्पष्ट झाले की, आर्थिक अडचणींमुळे आलेल्या तीव्र नैराश्यातून उमेश व बजरंग लखे यांनी मध्यरात्रीच्या सुमारास आपल्या आई-वडिलांचा गळा दाबून खून केला. त्यानंतर दोघेही दुचाकीवरून मुगट रेल्वेस्थानक गाठून धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली.

या प्रकरणी बारड पोलीस ठाण्यात मयत दोन्ही मुलांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक मंठाळे यांनी दिली.

