नांदेड, आनंदा बोकारे| नांदेड ते नाळेश्वर हा रस्ता एक ते दीड वर्षापूर्वी तयार करण्यात आला असून निकृष्ट कामामुळे सिमेंट रस्त्याच्या मध्यभागी भेगा पडल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. नांदेड ते नाळेश्वर या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भ्रष्ट कारभारामुळे जिल्हाभर चांगलेच गाजले होते. एक ते दीड वर्षापूर्वी सी.सी.रस्ता तयार करण्यात आला होता.


या रस्त्यावर मिल गेट ते मल्हार चौक, हसापूर व वाघी ते नाळेश्वर रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत तसेच मल्हार चौक ते वाघी आरटीओ पासिंग कार्यालयापासून नाळेश्वर पर्यंत मोठमोठे खड्डे पडले असून या रस्त्यावर बर्याच प्रमाणात अपघात घडले आहे. नांदेड ते लिंबगाव रस्ता काम चालू असल्यामुळे या मार्गावरील बरीचशी वाहतूक नांदेड ते जैतापूर रस्त्यावर पूर्णा या मार्गाकडे जात असतात त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वर्दळ निर्माण झाली असून व अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. तसेच हसापूर मल्हार चौक ते वाघी आरटीओ पासिंग कार्यालय पर्यंत दीड वर्षांपूर्वी सिमेंट रस्ता केला असून या रस्त्यावर मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत.


सदरील रस्ता निकृष्ट दर्जाचा करण्यात आला असून या कामाची चौकशी करण्याची मागणी परिसरातील गावातील नागरिकांनी केली आहे. या रस्त्यावर शाळा, महाविद्यालय दवाखाने दहा ते पंधरा गावांचा संपर्क असून तसेच पूर्णा, परभणीलाही हा रस्ता नाळेश्वर मार्गे जोडला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर वळत असते परंतु दीड वर्षांपूर्वी झालेल्या रस्त्यात जर मोठ मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या असून व रस्ताही उखडत असून त्यामुळे या रस्त्यावर तात्काळ लक्ष देवून पावसाळ्यापूर्वी हा रस्ता खड्डे व भेगा बुजून घ्यावी अशी मागणी या परिसरातून होत आहे.

आ.कल्याणकरांचे दुर्लक्ष
नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आ.बालाजी कल्याणकर आपल्या मतदारसंघात मोठ-मोठी विकास कामे केल्याचा गाजावाजा करीत असले तरी नाळेश्वर, रहाटी, सोमेश्वर, जैतापूर, वाघी, ढोकी, बोरगाव यासह अन्य गावातील काही विकास कामे दर्जेदार झालेली आहेत. मात्र बहुतांश गाव परिसरातील रस्त्यांची मात्र वाट लागल्याचे पहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे रेती माफियांच्या अवजड वाहनांची या भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. त्यामुळे जबरदस्त बनवण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यांना दीड वर्षातच भेगा पडत आहेत. आता या रस्त्यांची चाळणी होईपर्यंत विद्यमान आ.कल्याणकर फिरकणार की नाही? असा सवाल नाळेश्वर व परिसरातील जनतेतून विचारला जात आहे.