हिमायतनगर, अनिल मादसवार| महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जनतेचे लाडके नेते अजितदादा पवार यांचे विमान दुर्घटनेत झालेल्या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने राज्याने एक कणखर, दूरदृष्टी असलेले आणि जनतेशी नाळ जुळवून ठेवणारे नेतृत्व गमावले आहे.

या दु:खद घटनेच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर शहरात सर्वपक्षीय नागरिक व व्यापारी बांधवांनी स्वयंस्फूर्तीने बाजारपेठ बंद ठेवून अजितदादांना श्रद्धांजली अर्पण केली. शहरातील वातावरण शोकमय झाले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःख आणि हळहळ स्पष्टपणे दिसून येत होती.

हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरासमोर अजितदादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. यावेळी आयोजित श्रद्धांजली सभेत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, काँग्रेस यांसह सर्वपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येत एका महान नेत्याला अखेरचा निरोप दिला.



श्रद्धांजली सभेत अनेक मान्यवरांनी अजितदादांच्या कार्याचा, त्यांच्या स्पष्टवक्तेपणाचा आणि विकासाभिमुख दृष्टिकोनाचा उल्लेख करत “अजितदादा हे केवळ नेते नव्हते, तर जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणारे नेतृत्व होते” अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तर शब्दांत हळहळ दिसून येत होती. अजितदादांच्या निधनाने निर्माण झालेली ही पोकळी कधीही भरून न निघणारी असून, हिमायतनगरसह संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या आठवणींना सदैव जपेल, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

