नांदेड| मुखेड तालुक्यातील माऊली येथील मौला नबीसाब शेख हा व्यक्ती मौजे बेटमोगरा शिवारामध्ये 28 ऑगस्ट रोजी अडकला होता. हा व्यक्ती बेटमोगरा येथे किराणा खरेदीसाठी आला होता. सायंकाळी माऊलीकडे जात असताना उच्या पुलाजवळ पाणी आल्याने पुलाला लागून असलेल्या शेडमध्ये त्यांनी आश्रय घेतला. परंतु पाण्याचा प्रवाह वाढल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. त्यांनी संपूर्ण रात्रभर शेडमध्येच आश्रय घेतला व मोठ्या हिंमतीने तिथेच थांबला. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने एसडीआरएफ टीमने संबंधित व्यक्ती पर्यंत पोहोचून त्याला सुरक्षित रात्री 11 वा. बाहेर काढले. या बचाव कार्याचा जिल्हाधिकारी राहुल कर्डीले ही वेळोवेळी आढावा घेत होते. एसडीआरएफ टीमचे नेतृत्व श्री. राठोड आणि संकपाळ यांनी करुन मोठ्या धाडसाने हे रेस्क्यूऑपरेशन केले.



ही बाब स्थानिक प्रशासनाला समजली तेंव्हा देगलूर उपविभागीय अधिकारी यांनी तहसीलदार मुखेड यांच्याशी संपर्क साधला. मुखेड तहसीलदार यांनी स्थानिक नगरपालिका बचाव टीम व मुखेडचे पोलीस निरीक्षक त्या ठिकाणी पोहोचले. परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने संबंधित व्यक्तीला बाहेर काढता आले नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी संबंधित व्यक्तीला एसडीआरएफमार्फत तात्काळ सुरक्षितस्थळी हलवण्याचे निर्देश दिले.


त्या अनुषंगाने एसडीआरएफ टीम देगलूर तालुक्यातील मेदनकाल्लूर गावामधील पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित हलवल्यानंतर तात्काळ बेटमोगराकडे रवाना झाली. उपविभागीय अधिकारी अनुप पाटील यांनी एसडीआरएफ टीम सोबत रात्री 9.30 वाजता त्य ठिकाणी पोहचले. रात्रीची वेळ असल्याने आणि पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने संबंधित व्यक्तीशी संपर्क होत नव्हता. ही परिस्थिती लक्षात घेता स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने एसडीआरएफ टीमने संबंधित व्यक्ती पर्यंत पोहोचून त्याला सुरक्षित रात्री 11 वाजता बाहेर काढले. यावेळी प्रशासनामार्फत देगलूर उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, मुखेड तहसीलदार राजेश जाधव, मुखेडचे पोलीस निरीक्षक, केंद्रे संबंधित ग्रामस्थ आणि स्थानिक प्रशासन उपस्थित होते.



