Himayatnagar railway gate road potholes suffer motorists | हिमायतनगर रेल्वे फाटक रस्त्याच्या खड्डयांमुळे वाहनधारक त्रस्त; अपघाताची शक्यता वाढली – NNL


हिमायतनगर,अनिल मादसवार| किनवट – भोकर या राष्ट्रीय महामार्गावरील असलेल्या हिमायतनगर शहराजवळील रेल्वे फाटक रस्त्यावर खड्डेच खड्डे निर्माण झाले आहेत. येथून जाताना रस्त्यात खड्डा आहे कि… खड्ड्यात रस्ता हे कळणे अवघड बनले आहे. यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. संबंधित विभागाने या जीवघेण्या रस्त्याकडे लक्ष देऊन किमान पावसाळ्यात त्रास होऊ नये यासाठी तात्काळ खड्डे बुजवून संभाव्य धोका टाळावा अशी मागणी केली जाते आहे.



नांदेड जिल्ह्यातील धनोडा ते भोकर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ ची निर्मिती करताना हिमायतनगर जवळील रेल्वे फाटकावरून उड्डाण पूल मंजूर करण्यात आला होता. दरम्यान ठेकेदारने हिमायतनगर ते धानोडा आणि भोकर ते रेल्वे फाटक दरम्यानच्या रस्त्याचे काम पूर्ण केले. मात्र संबंधित ठेकेदाराने हिमायतनगर शहरानजीक असलेल्या रेल्वे फाटक पासून उड्डाण पुलाचे काम जाणीवपूर्वक केले नाही. त्यामुळे रेल्वे जाईपर्यंत नागरिकांना ताटकळत बसावे लागते आहे. एखादी गंभीर बाब असल्यास रेल्वे जाईपर्यंत रुग्णवाहिका व अन्य महत्वपूर्ण व्यक्तींचा वेळ वाया जात आहे. यामुळे मोठ्या परिणामाचा सामना करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.


तसेच रेल्वे फाटकानजीकचा संपूर्ण रस्त्यावर खड्डेच खड्डे तयार होऊन रस्त्याची चाळणी झाली आहे. परिणामी येथून वाहन चालविताना अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच खड्डा चुकविण्याच्या नादात अनेक दुचाक्यांची घसरगुंडी होत असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. हि बाब लक्षात घेता तात्काळ रेल्वे फाटकाच्या उड्डाण पुलाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी जागरूक नागरीकातून केली जात आहे. ठेकेदाराने या रत्स्यावरील पुलाचे व काही ठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट का..? ठेवले असा सवालही सर्वसामान्य जनतेतून विचारला जात आहे.



या समस्येकडे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, प्रकल्प संचालक भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, कार्यकारी अभियंता मुंबई यांनी गांभीर्याने लक्ष देऊन उड्डाण पुलाचा प्रश्न मार्गी लावावा. आणि उड्डाण पुलाचे काम रखडत ठेवण्यास आणि शहरानजीक अर्धवट रस्त्याचे काम ठेवण्यास जबाबदार असलेल्या कंत्राटदार व प्रशासकीय आधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.





