मुंबई| भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन, सर्वसमावेशक आणि समताधिष्ठित संस्कृती असून तिचे वैशिष्ट्य तसेच भारतीय भाषांचे वेगळेपण जागतिक स्तरावर अधिक ठळकपणे मांडण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. घाटकोपर येथील एसपीआरजे कन्याशाळेत आयोजित ‘सुकन्या समृद्धी योजना’ अंतर्गत बालिकांच्या आर्थिक सक्षमीकरण कार्यक्रमात ते बोलत होते.


मुख्यमंत्री म्हणाले की, भारतीय संस्कृती प्रत्येक व्यक्तीला समान संधी आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार देते. समाजातील सक्षम घटकांनी दुर्बलांना आधार देणे हीच भारतीय परंपरेची खरी ओळख आहे. मुलींचे शिक्षण आणि आर्थिक सक्षमीकरण हे देशाच्या प्रगतीचे महत्त्वाचे आधारस्तंभ असून महिलांना समान संधी देणारी राष्ट्रेच विकासाच्या शिखरावर पोहोचली आहेत.


त्यांनी सांगितले की, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानानंतर मुलींच्या शिक्षणाला नवी गती मिळाली असून ‘सुकन्या समृद्धी योजना’ मुलींच्या भविष्यासाठी आर्थिक सुरक्षा निर्माण करणारी प्रभावी योजना ठरत आहे. कार्यक्रमात ट्रस्टच्या माध्यमातून एक हजार मुलींची ‘सुकन्या समृद्धी योजना’ आणि ‘एनपीएस वात्सल्य योजना’ अंतर्गत नोंदणी करण्यात आली. प्रत्येक खात्यात २० हजार रुपयांची प्रारंभिक रक्कम जमा करण्यात आली असून पुढील दहा वर्षे दरवर्षी तेवढीच रक्कम जमा केली जाणार आहे.




मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुलींना ओझे समजण्याची मानसिकता समाजाने कायमची सोडून देण्याचे आवाहन करत, त्यांचे संरक्षण, शिक्षण आणि आर्थिक सक्षमीकरण ही शासनाबरोबरच संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी समाजहितासाठी योगदान देणारे गौरव भंडारी यांच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. तसेच विद्यार्थिनी आणि त्यांच्या मातांना ‘सुकन्या समृद्धी योजना’ अंतर्गत प्रातिनिधिक धनादेशांचे वितरण करण्यात आले.

