नांदेड| राज्यातील अकाली निधन झालेल्या शिक्षण सेवकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तसेच त्यांच्या न्याय हक्कांसाठी आणि प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षण सेवक कृती समिती, नांदेडच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी महात्मा फुले चौकात कॅण्डल मार्च काढण्यात आला.


कॅण्डल मार्चपूर्वी समाजसुधारक महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. या वेळी शिक्षण सेवकांनी विविध मागण्यांसाठी एकजूट दाखवत शासनाच्या धोरणांबाबत नाराजी व्यक्त केली.


शिक्षण सेवकांना नियमित शिक्षकांप्रमाणे काम करूनही सेवा कालावधीत कोणतीही सुरक्षा मिळत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. शिक्षण सेवकांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक संरक्षण किंवा नोकरीची हमी मिळत नसल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे मयतांच्या वारसांना नोकरी देऊन आर्थिक मदत करावी, तसेच शिक्षण सेवकांना सर्व प्रकारचे सेवा संरक्षण लागू करावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.



याशिवाय, शिक्षण सेवक कालावधी रद्द करण्याची मागणीही पुन्हा जोरात पुढे आली. या संदर्भातील याचिकेवर सरकार स्पष्ट भूमिका घेत नसून विलंब करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
आदरांजली सभेत प्रा. डॉ. विनोद चव्हाण यांनी शिक्षण सेवकांच्या प्रश्नांकडे शासन सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचे सांगितले. तर प्रा. आकाश करंडे यांनी भरती प्रक्रियेत झालेल्या विलंबामुळे शिक्षण सेवकांचे वय वाढत असून कमी मानधनावर दीर्घकाळ काम करावे लागत असल्याची समस्या मांडली. या कॅण्डल मार्चमध्ये विविध शाळा व महाविद्यालयांतील नवनियुक्त शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.






