हिमायतनगर (अनिल मादसवार) शहरात सध्या टवाळखोर तरुणांचा हैदोस माजला असून ‘फटाका बुलेट’सह कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकींचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सायलेंसरमध्ये अवैध बदल करून मुद्दाम मोठा आवाज करत शहरातील मुख्य रस्ते, चौक, निवासी भाग आणि गल्लीबोळीत फेऱ्या मारल्या जात आहेत. विशेष म्हणजे रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या प्रकारामुळे शहरातील शांतता पूर्णपणे भंग होत आहे.


शहरातील शाळा, कॉलेज, महाविद्यालय तसेच मंदिर परिसरातही ही वाहने भरधाव वेगात फिरत असल्याने सर्वसामान्य नागरिक, महिला आणि शालेय विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत असून नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेकदा हे वाहनचालक वेगमर्यादा धुडकावून स्टंटबाजी करत असल्याने अपघाताचा धोका देखील वाढला आहे.

नागरिकांकडून वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. “अशा वाहनांवर तातडीने दंडात्मक कारवाई करावी, अवैध सायलेंसर जप्त करावेत आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत,” अशी ठाम मागणी नागरिकांकडून होत आहे.


दरम्यान, नुकतेच नांदेड येथे पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी अशा कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकींवर धडक कारवाई करून संबंधितांना चांगलीच अद्दल घडवली आहे. त्याच धर्तीवर हिमायतनगर शहरातही विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करावी, अशी भावना सुजाण नागरिक तसेच महिला व मुलींच्या पालकांकडून व्यक्त होत आहे.

(संपादकीय टिप्पणी)
कायद्याचा धाक राहावा आणि नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी अशा बेजबाबदार प्रकारांवर वेळीच आळा घालणे अत्यावश्यक आहे. अन्यथा टवाळखोरांचा हा वाढता त्रास प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरू शकतो.



