हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील पिंपळगाव येथे दि. २० मार्च ते २७ मार्च दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य श्रीराम कथा सोहळ्यानिमित्त उभारण्यात येणाऱ्या कथा मंडपाचे भूमिपूजन बुधवारी बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांच्या पावन हस्ते भक्तिमय वातावरणात संपन्न झाले.

वेदघोष, मंत्रोच्चार आणि जयघोषाच्या निनादात पार पडलेल्या या सोहळ्याने परिसरात अध्यात्मिक उर्जा संचारली. पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मंगल प्रसंगाचे साक्षीदार ठरले. राधाकृषणजी महाराज जोधपूर यांच्या मधुर वाणीत भव्य श्रीराम कथा पार पडणार असून, यां धार्मिक सोहळ्याची जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे.


यावेळी बोलताना बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी, “श्रीराम कथा ही केवळ धार्मिक कार्यक्रम नसून समाजाला सदाचार, संस्कार आणि एकतेचा संदेश देणारी प्रेरणादायी पर्वणी आहे. सर्वानी गतवर्षी चांगली सेवा दिली, तशीच सेवा यंदाच्या कथेदरम्यान देखील करावी व कथेचा सर्वानी लाभ घ्यावा. यंदाही 108 कुंडी दत्त याग यज्ञ होणार असून, यात सहभागी होणाऱ्या दाम्पत्यांनी मंदिर कमेटीकडे संपर्क साधावा असे आवाहन केले. तर या धर्मकार्यासाठी भाविकांनी तन, मन, धनाने सहकार्य करावे आणि मोठ्या संख्येने कथेला उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी,” असे आवाहन शिवसदगुरु शिवलिंगस्वामी दत्त संस्थान मठ तीर्थक्षेत्र पिंपळगाव च्या आयोजकांनी केले.



या पवित्र भूमिपूजन सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्मिक भावनेने भारावून गेला. आगामी श्रीराम कथेमुळे समाजात सकारात्मकता, नैतिक मूल्ये आणि एकात्मतेचा संदेश अधिक दृढ होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. भव्य आणि दिव्य अशा या श्रीराम कथा सोहळ्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


