हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर येथील महावितरण कार्यालयात उघडकीस आलेल्या अनधिकृत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब व तारांच्या पुरवठा प्रकरणाने संपूर्ण तालुका हादरून गेला असताना, या गंभीर भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्याचा प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. तब्बल 13 हून अधिक ट्रान्सफॉर्मर बेकायदेशीररीत्या बसवले जात असताना, जबाबदारी मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांऐवजी खालच्या कर्मचाऱ्यांवर ढकलण्याचा प्रयत्न केला जात आहे.

इतक्या मोठ्या प्रमाणात साहित्याची हालचाल वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाशिवाय अशक्य असताना, केवळ दोन लाइनमनवर निलंबनाची कारवाई सुचवून खरे दोषी वाचवले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. ही कारवाई म्हणजे “मोठ्यां माश्याना वाचवण्यासाठी छोट्यांचा बळी” दिला असल्याचे स्पष्टपणे बोलले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील बडगावकर यांनी संतप्त शब्दांत प्रतिक्रिया देताना सांगितले की, “हा केवळ गैरव्यवहार नसून थेट भ्रष्टाचार आहे. वरिष्ठ अधिकारी, ठेकेदार आणि स्थानिक साटेलोटे यांची साखळी उघड होऊ नये म्हणून चौकशी मुद्दाम दिशाभूल केली जात आहे. दोन लाइनमन निलंबित करून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न आम्ही कदापि सहन करणार नाही.”


ते पुढे म्हणाले, “जर संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी वरिष्ठ अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई झाली नाही, तर हे आंदोलन जिल्हास्तरावर नेऊन महावितरण प्रशासनाला धडा शिकवू.”

महावितरण मधील अन्यायकारक कारभार व वीज ग्राहकांना वेठीस धरण्याचे प्रकाराच्या निषेधार्थ हिमायतनगर येथे आमरण उपोषण व तीव्र आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमण्याचे आणि योग्य कारवाईचे आश्वासन दिले. मात्र, हे आश्वासन केवळ वेळकाढूपणा असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
लेखी आश्वासनाने उपोषण मागे घेतले असले तरी आज जनतेसमोर एकच प्रश्न आहे तो म्हणजे महावितरणमधील हा भ्रष्टाचार उघड होणार की..? चौकशीच्या नावाखाली कायमचा गाडला जाणार? जर महिन्यात खरे दोषी समोर आले नाहीत, तर जनतेचा रोष प्रशासनाविरुद्ध अधिक तीव्र होणार, आणि याविरोधात पुन्हा आंदोलन उभारणार असेही वामनराव पाटील मीराशे यांनी सांगितले.

