कंधार, सचिन मोरे| उच्च माध्यमिक मंडळाच्या १२ वीच्या परीक्षेला दिनांक १० फेब्रुवारी २०२६ पासून सुरुवात होत आहे. परीक्षा ऐन तोंडावर आल्या असताना मंडळाने शहरात दोन परीक्षा केंद्रावर ८९५ मुले- मुली परीक्षा देणार होते. त्यांना प्रवेशपत्र वाटपही करण्यात आली आहे.

अशा वेळी लातूर विभागीय मंडळाने ५ फेब्रुवारीला एक आदेश परित करून कंधार शहरात तिसऱ्या परीक्षा केंद्राला मान्यता देऊन या केंद्रावर १६५ विद्यार्थ्याच्या परीक्षेची व्यवस्था केल्याने ऐन परीक्षेच्या तोंडावर १६५ विद्यार्थ्यांची धावपळ होणार असल्याचे चित्र कंधार शहरात निर्माण झाले असून या प्रकारामुळे शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला असून शिक्षण विभागाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.

बारावी परीक्षेसाठी शहरात श्री शिवाजी कॉलेज नवरंगपूरा व श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पानभोसी रोड कंधार असे दोन परीक्षा केंद्र आहेत. या केंद्रावर परीक्षेची तयारी सुरू असतानाच बोर्डाने ५ फेब्रुवारीला नंदकिशोर बिडवई उच्च माध्यमिक विद्यालयास १२ वीच्या परीक्षेचे केंद्र म्हणून मान्यता दिली.आणि या केंद्रावर १६५ विद्यार्थ्यांच्या परीक्षेची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत.


शहरातील ८९५ विद्यार्थ्यांना दोन केंद्रातून प्रवेशपत्र वाटप करण्यात आले आहेत.यातील १६५ विद्यार्थ्यांना नंदकुमार बिडवई उच्च माध्यमिक विद्यालय या केंद्रावर परीक्षेसाठी जावे लागणार आहे. यात प्रवेशपत्र क्रमांक T010844 ते T010968 (विज्ञान), T086837 ते T086876 (वाणिज्य ) या नंबरचा समावेश आहे.

वरील बैठक क्रमांक मधील विद्यार्थ्याच्या परीक्षा केंद्रात बदल झाल्याने त्यांनी शहरातील कै.नंदकुमार बिडवई विद्यालयात संपर्क करावा असे आवाहन श्री शिवाजी कॉलेज नवरंगपूराचे प्राचार्य व श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पानभोसी रोड कंधारचे मुख्याध्यापक यांनी केले आहे.
परीक्षा ऐन तोंडावर आल्या असताना रातोरात शिक्षण विभागाने तुघलकी कारभाराचे दर्शन घडवत अध्यादेश काढून शहरातील 165 विद्यार्थी व त्यांच्या पालकांना मोठ्या धर्म संकटात टाकलेले आहे. या सावळ्या गोंधळामुळे शिक्षण विभागात कोणत्याही अधिकाऱ्याचे नियंत्रण नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाल्याचे दिसून येत आहे. या प्रकारामुळे शहरातील विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरल्याचे दिसून येत आहे.

