हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर येथील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. माजी DRUCC सदस्य गौतमचंद सुरजमल पिंचा, गणेशराव शिंदे आणि प्रवीण कोमावार यांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद जनरल मॅनेजर यांच्या दौऱ्यादरम्यान पत्र देत हिमायतनगर, नांदेड व परिसरातील प्रवाशांच्या सुविधांसाठी रेल्वे सेवांमध्ये तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली आहे.

या निवेदनात प्रवाशांना भेडसावणाऱ्या अडचणी मांडत चार महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आदिलाबाद–परळी वैजनाथ पॅसेंजर (गाडी क्र. 57564) ला एक्सप्रेस दर्जा देऊन वेळापत्रकात सुधारणा करावी, जेणेकरून ही गाडी सकाळी १० वाजेपर्यंत परळी वैजनाथ येथे पोहोचेल अशी प्रमुख मागणी आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास सुलभ होण्याची अपेक्षा आहे.

तसेच पनवेल–हुजूर साहिब नांदेड एक्सप्रेस (गाडी क्र. 17613) चे वेळापत्रक पहाटे ४.२० वाजता निश्चित करावे, जेणेकरून आदिलाबाद व नांदेड येथील प्रवाशांना 77615 या गाडीशी सोयीस्कर कनेक्शन मिळू शकेल, असे नमूद करण्यात आले आहे.


याशिवाय नागपूर–नांदेड- नागपूर नवीन एक्सप्रेस सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली असून, यामुळे मराठवाडा व विदर्भातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. यासोबतच दीक्षाभूमी एक्सप्रेस (11045/11046) ला हिमायतनगर रेल्वे स्थानकावर थांबा देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या सेवेचा लाभ प्रवाशांना मिळत नसल्याने ही मागणी जनहिताच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर विचार करू असे आश्वासन देण्यात आले आहे.


दरम्यान गुरुवारी दुपारी सिकंदराबाद रेल्वे विभागाचे डिव्हिजनल जनरल मॅनेजर यांनी हिमायतनगर रेल्वे स्थानकाला प्रत्यक्ष भेट देत येथे सुरू असलेल्या अमृत भारत योजनेतील विकासकामांची पाहणी केली. कामांच्या प्रगतीबाबत माहिती घेत त्यांनी संबंधित ठेकेदाराला कामाच्या दर्जात सुधारणा करण्याच्या तसेच विकासकामांना गती देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.

या पाहणी दौऱ्यावेळी नांदेड रेल्वे डिव्हिजनचे वरिष्ठ विभागीय अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी–कर्मचारी तसेच मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त उपस्थित होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीमुळे आणि अमृत भारत योजनेतील कामांना मिळालेल्या गतीमुळे हिमायतनगर–नांदेड रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या सुविधा सुधारण्याच्या अपेक्षा बळावल्या असून, दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाकडून लवकरच सकारात्मक निर्णय होईल, अशी आशा प्रवासी वर्गातून व्यक्त होत आहे.
