हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील मंगरूळ परिसरात वीज वितरण व्यवस्थेची गंभीर अवस्था समोर आली आहे. मंगरूळ भागातील बबन खंदारे यांच्या शेतात असलेला वीज डीपी सध्या अत्यंत धोकादायक स्थितीत असून या डीपीवर तब्बल २१ शेतकरी अवलंबून आहेत. डीपीवरील केबल जळालेली असून किटकॅटही नसल्याने कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या धोकादायक स्थितीबाबत शेतकऱ्यांनी नोव्हेंबर महिन्यातच संबंधित अभियंता चव्हाण व लाईनमन जाधव यांना प्रत्यक्ष माहिती दिली होती. मात्र, त्यानंतरही आजपर्यंत कोणतीही दुरुस्ती अथवा प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे महावितरणच्या कार्यप्रणालीवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

याचप्रमाणे भदेवाड येथील डीपीवरही २५ शेतकरी अवलंबून असून तेथेही अगदी अशीच भयावह परिस्थिती आहे. दोन्ही ठिकाणी वीजपुरवठा असुरक्षित असल्याने शेतकरी जीव मुठीत धरून शेतीकामे करत आहेत.



रब्बी हंगाम सुरू असताना वीजपुरवठ्यातील या त्रुटींमुळे शेती कामांवर मोठा परिणाम होत असून शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडले आहेत. अपघात घडण्याची वाट पाहण्याऐवजी महावितरणने तातडीने संबंधित डीपींची दुरुस्ती करावी, नवीन केबल व आवश्यक संरक्षक साहित्य बसवावे, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. शेतकऱ्यांचा हा आवाज महावितरणच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.


“मंगरूळ परिसरात अनेक ठिकाणी विद्युत पोल जमिनीकडे झुकले असून त्यामुळे विद्युत तारांचे धोकादायक झोपाळे तयार झाले आहेत. ही परिस्थिती शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण करणारी असून कोणत्याही क्षणी मोठा अपघात घडू शकतो. ही गंभीर बाब लक्षात घेता महावितरण विभागाने तातडीने लक्ष घालून संबंधित पोल व तारांची दुरुस्ती करून सुरक्षित वीजपुरवठा करावा,” अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.

