हिमायतनगर (अनिल मादसवार) विदर्भ- मराठवाड्यासह नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण संस्कृतीचा आत्मा मानल्या जाणाऱ्या आणि सुमारे ३०० वर्षांची परंपरा लाभलेल्या शंकरपट (बैलगाडा शर्यत) स्पर्धा सध्या सर्वत्र उत्साहात साजऱ्या होत आहेत. हिमायतनगर तालुक्यातील दुधड वाळकेवाडी येथे श्री गुरु समर्थ रामबापू मेटकर महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित यात्रा महोत्सवात दि. १ फेब्रुवारी रोजी भव्य शंकरपट स्पर्धेचे उद्घाटन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते पार पडले.

या उद्घाटनप्रसंगी पारंपरिक वाद्यांचा गजर, बैलजोड्यांची सजावट आणि ग्रामस्थांचा जल्लोष पाहायला मिळाला. विदर्भ व मराठवाड्यातील विविध भागांतून आलेल्या शेकडो स्पर्धकांनी आपल्या दमदार बैलजोड्यांसह सहभाग नोंदवत बैलांच्या वेगाची चित्तथरारक परंपरा पुन्हा एकदा जिवंत केली. हजारो नागरिकांनी ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थिती लावली होती.

शंकरपट स्पर्धा ही केवळ खेळ नसून शेतकरी संस्कृतीचा अभिमान, ग्रामीण परंपरेचे प्रतीक आणि लोककलेचा अविभाज्य भाग असल्याचे यावेळी प्रकर्षाने जाणवले. वाळकेवाडी येथील ग्रामस्थांनी ही शेकडो वर्षांची परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने जपल्याचे चित्र पाहायला मिळाले.


या कार्यक्रमास जिल्हा नियोजन अधिकारी झाडे, जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती प्रताप देशमुख, विकास पाटील देवसरकर, उपसरपंच संजय माझळकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू पाटील शेलोडेकर, संभाराव लांडगे मामा, बबनराव पाटील, डॉ. गायकवाड, बालाजी राठोड, विनय देशमुख, गौरव पाटील, ज्ञानेश्वर पुट्टेवाड, शंकर बरडे, रामदास वाळके, सत्यव्रत ढोले, नगरसेवक आशिष सकवान, नगरसेवक सुभाष बलपेलवार, शिवसेना शहरप्रमुख गजानन हरडपकर, अन्वर खान, रामभाऊ सूर्यवंशी, सदाशिव सातव, संतोष मुद्देवाड, सुरज दासेवार, आदींसह दुधड वाळकेवाडी येथील ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


श्री गुरु रामबापू महाराज यात्रोत्सवाच्या निमित्ताने पार पडलेल्या या शंकरपट स्पर्धेमुळे परंपरा, श्रद्धा आणि ग्रामीण संस्कृतीचा त्रिवेणी संगम अनुभवायला मिळाला असून, वाळकेवाडीचा हा उत्सव पंचक्रोशीमध्ये विशेष आकर्षण ठरला आहे. दरम्यान दोन दिवसापासून येथे उत्तर उत्सव सुरु असून, यात्रा काळात हजारो भाविकणाइ महाप्रसाद घेऊन गुरु रामबापूंचे आशीर्वाद घेतले.
शंकरपट म्हणजे बळीराजाचा आपल्या जगाच्या पोशिंद्याचा खेळ आहे. शंकरपट ही महाराष्ट्रातील, विशेषतः विदर्भातील (यवतमाळ, वर्धा, अमरावती, बुलढाणा) भागात ग्रामीण बैलगाडी शर्यतीची परंपरा आहे. हे शेतकऱ्यांच्या कठोर परिश्रमाचे, एकतेचे आणि सामाजिक सौहार्दाचे प्रतीक आहे. हा उत्सव सहसा मकर संक्रांती किंवा वार्षिक यात्रेदरम्यान आयोजित केला जातो, जिथे बैलांची चपळता दाखवली जाते.

