Himayatnagar : केबल चोरी थांबेना; हिमायतनगर तालुक्यात पोलिस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

हिमायतनगर, अनिल मादसवार | हिमायतनगर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या शेतातील मोटर केबल चोरी करणाऱ्या टोळीचा धुमाकूळ सुरूच असून, आतापर्यंत पाच ते सहा गावांमध्ये अशा घटना घडल्या आहेत. या चोरीच्या घटनांमुळे शेकडो शेतकरी थेट बाधित झाले असून, शेतीची महत्त्वाची कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत.


बाधित शेतकऱ्यांनी वारंवार पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या असल्या तरी अद्यापही चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे चोरट्यांचे मनोबल वाढत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.

मंगळवारी रात्री हिमायतनगर तालुक्यातील सवना परिसरात अज्ञात चोरट्यांनी अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील मोटर केबल चोरून नेल्याची घटना घडली. या घटनेत ओमकार अनगूलवार, पोष्टी अनगुलवार, वसंतराव बिरकलवार, संदीप बिरकलवार, संतोष अनगुलवार, अशोक अनगुलवार, अशोक शिंदे, विलास बिरकलवार, तिरमक बिरकलवार, दिगांबर कतुलवार, साहेबराव बिरकलवार, मारोती तुंगेवाड, अरविंद बिरकलवार यांच्यासह इतर शेतकरी बाधित झाले आहेत.


मोटर केबल चोरीमुळे शेतकऱ्यांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद झाला असून, उभ्या पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर आणखी मोठे संकट कोसळले आहे.


या सततच्या घटनांमुळे शेतकरी वर्ग हतबल झाला असून, पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शेतीसाठी अत्यावश्यक असलेल्या मोटर केबल चोरीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.

या गंभीर प्रकरणाकडे जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी वैयक्तिक लक्ष देऊन, हिमायतनगर तालुक्यात कार्यरत असलेल्या मोटर केबल चोरी करणाऱ्या टोळीचा तातडीने छडा लावावा, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.



