राज्यात महाविकास आघाडीचेच सरकारी येईल : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. चंद्रकांत हंडोरे यांचा विश्वास -NNL

नांदेड। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्रात झालेला पराभव आणि महाविकास आघाडीला मिळालेले यश हे निश्चितपणे आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करणारे ठरेल . महाविकास आघाडी राज्यात 170 हून अधिक जागा जिंकेल असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी काल नांदेडमध्ये माध्यमांशी बोलताना व्यक्त केला . एका खाजगी कामानिमित्त हंडोरे नांदेड येथे आले असता ते माध्यम प्रतिनिधीशी बोलत होते .


यावेळी भीमशक्तीचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर दिनेश निखाते , सुरेश हटकर संजय कवठेकर, शत्रुघ्न वाघमारे , प्रकाश दिपके , मिलिंद लोकरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. मध्यमशी संवाद साधताना खा. हंडोरे म्हणाले की , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपकी बार चार सौ पार चा नारा देण्यात आला होता. चार सो पारचा नारा देत असताना भारतीय जनता पार्टीच्या काही खासदाराकडून संविधान बदल करण्याच्या भाषा केल्या जात होत्या. त्यासाठी त्यांची अंतर्गत तयारीही झाली होती . त्याचाच एक भाग म्हणून राज्यघटनेने ज्या स्वायत संस्था उभ्या केल्या त्या स्वायत संस्थांचा गैर वापर करणे सुरू केले. त्यांच्या कामात अवास्तव हस्तक्षेप करणे त्या संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न करणे हा जो काही कारभार सुरू आहे तो कारभार भारतीय राज्यघटनेच्या तत्त्वाला पायदळी तूडवणारा कारभार आहे .

सीबीआय , इन्कम टॅक्स , रिझर्व बँक या व अशा काही स्वायत संस्थांचा मोदी सरकारने दुरपयोग केला. त्यामुळे जनतेच्या मनात मोदी सरकारच्या विरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला होता . त्यामुळे महाविकास आघाडी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत 234 जागांवर विजयी झाली तर 167 जागांवर अवघ्या दोन हजार मतांच्या फरकाने पराभूत झाली आहे. त्यातील 100 जागा ह्या 1000 हून कमी मतांनी पराभूत आहेत तर त्यातील 48 जागा या केवळ शंभर मताहून कमी मतांनी पराभूत आहेत . या ठिकाणी भाजपा महायुतीच्या वतीने गेमिंग करण्यात आला आहे . अन्यथा भाजपाला सत्तेतून बाहेर खेचण्याचा जो जनतेचा कौल होता तो पूर्णपणे यशस्वी झाला असता. देशात मोदीची फसव्हगिरीची गॅरंटी लोकांना मान्य नाही . हे आता सिद्ध झाले आहे. महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने अनेक राजकीय पक्षाची फाटाफूट केली. त्याचाही परिणाम भारतीय जनता पार्टीला भोगाव लागला .


मराठा समाजाची केलेली फसवणूक , धनगर समाजाची केलेली फसवणूक, मुस्लिम समाजाच्या बाबतीत निर्माण केलेले असुरक्षिततेचे वातावरण या सर्व बाबींमुळे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जनमत तयार झाले होते . परिणामी महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 31 जागा मिळाल्या याचा अर्ध विधानसभेच्या 154 जागांवर महाविकास आघाडीचा आत्ता विजय निश्चित आहे तरीही आम्ही किमान 170 जागा जिंकण्याच्या प्रयत्नात आहोत . आमचे तिन्ही पक्ष ताकतीने आणि एकत्रित लढतील आणि निश्चितपणे विजय होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बाळासाहेबांनी आताही विचार करावा
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू म्हणून आणि आंबेडकरी घरण्याप्रती महाराष्ट्रातील तमाम शोषित , पीडित , वंचितांना आदर आहे . परंतु बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने राजकारण सुरू केले आहे ते राजकारण सत्तेच्या मार्गावर जाणारे नाही. कोणत्याही एका जातीच्या मतावर आपण निवडून येत नाहीत. त्यामुळे आपल्या मर्यादा ओळखून राजकारण करण्याची गरज आहे. आमची अजूनही बाळासाहेब आंबेडकरांना विनंती आहे की, त्यांनी महाविकास आघाडीमध्ये येण्याचा सकारात्मक विचार करावा. निश्चितपणे त्याचे परिणाम चांगले होतील आणि महाराष्ट्रात एक दमदार आणि ताकतवान सरकार स्थापन होईल. असा विश्वास खा. चंद्रकांत हंडोरे यांनी व्यक्त केला .
पराभूतांच्या चिंतन बैठकानी काय फरक पडणार ?
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा दारुण पराभव झाला. यात मराठवाड्यात भाजपाला एकही जागा मिळवली नाही . त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने ज्या ज्या ठिकाणी पराभव झाला त्या ठिकाणी आता चिंतन बैठक आयोजित केल्या घेतल्या आहेत. मात्र या चिंतन बैठकांना येणारे लोकही पराभूत झालेले आहेत. त्यामुळे पराभूत लोकांकडून चिंतन बैठकात नेमके काय विचारमंथन होईल याचा त्यांनीच आत्मचिंतन करण्याची गरज आहे . किंबहुना त्यांच्या चिंतन बैठकांमधील लाथाळ्या सुरू आहेत . यावरून भारतीय जनता पार्टीत सगळे काही आता ठीकठाक सुरू आहे असे नाही. आगामी काळात भाजपाचेही शकले पडतील असेही ते म्हणाले.



