नांदेड | नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने मिळवलेला दणदणित विजय म्हणजे महाराष्ट्रातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर दाखवलेला ठाम विश्वास असल्याचे प्रतिपादन खासदार अशोकराव चव्हाण यांनी केले.


विकसित भारत व विकसित महाराष्ट्र या भाजपच्या संकल्पनेला मतदारांनी कौल दिला असून, भाजपच्या विकासकामांच्या धडाक्याला मिळालेला हा अनुकूल प्रतिसाद असल्याचे त्यांनी सांगितले. या निवडणुकीत नांदेड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी हा निर्विवादपणे क्रमांक एकचा राजकीय पक्ष ठरला आहे. जिल्ह्यात भाजपचे सर्वाधिक नगराध्यक्ष व नगरसेवक विजयी झाले असून, भाजपचे अधिकृत तीन नगराध्यक्ष निवडून आले आहेत. त्याचबरोबर सहयोगी नगराध्यक्षांच्या रूपाने भाजपच्या यशात अधिक भर पडली आहे. नांदेड जिल्ह्यात भाजपचे अधिकृत ७४ नगरसेवक निवडून आले असून, सहयोगी सदस्यांसह भाजपचे एकूण संख्याबळ १०० च्या घरात पोहोचले आहे, असेही चव्हाण यांनी नमूद केले.

काही नगरपरिषदांमध्ये अपेक्षित यश मिळू शकले नसल्याची कबुली देत, भाजपचे आमदार असलेल्या मतदारसंघांमध्ये उमेदवार निश्चितीपासून रणनितीपर्यंत संबंधित आमदारांवर संपूर्ण जबाबदारी होती. मात्र, काही ठिकाणी उणिवा व समन्वयाचा अभाव राहिल्याने भाजपचे संख्याबळ अधिक वाढू शकले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत या उणिवा दूर करून त्याची भरपाई करण्यात येईल, असा विश्वास खासदार अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केला.


