हिमायतनगर, अनिल मादसवार| “मोबाईल ही विना वासाची दारू आहे. दारुपेक्षा वाईट व्यसन म्हणजे मोबाईल असून, लहान वयात मुलांच्या हाती मोबाईल देणे त्यांच्या भविष्यासाठी घातक ठरते. त्यामुळे माता–पित्यांनी आपल्या मुलांच्या हातात मोबाईल देऊ नये,” असा मौलिक संदेश परमपूज्य बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी दिला.



श्रावण महिन्यातील धार्मिक उत्सवाच्या समारोपप्रसंगी श्री परमेश्वर मंदिर, हिमायतनगर येथे आयोजित मार्गदर्शन समारंभात ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, “संस्कारातूनच पिढी घडते, हे जिजाऊ व सावित्री बाईंच्या कार्यातून शिकायला हवे. मुलांवर चांगले संस्कार करा, मुलांना सैनिकांचा आदर्श द्या. देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांमुळे आपण सुरक्षित आहोत. त्यामुळे प्रत्येकाने सैनिकांसाठी दररोज एक वेळ प्रार्थना करायला हवी.” “मोबाईलपासून मुलांना दूर ठेवा, चांगले संस्कार द्या आणि देशासाठी सैनिक घडवा. आज घडीला भारताला संस्कारी, निर्व्यसनी नवतरुण नेतृत्वाची गरज आहे,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले. मंचावर माधवराव पाटील जवळगावकर, मंदिराचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंता देवकते सर्व संचालक मंडळी व हजारोच्या संख्येत महिला- पुरुष भाविक भक्त उपस्थित होते.


समारोप सोहळा उत्साहात
महिनाभर सुरू असलेल्या ॐ नमः शिवाय अखंड नामजप यज्ञाचा समारोप मोठ्या उत्साहात झाला. यावेळी विविध भजनी मंडळांचा व्यंकट स्वामी महाराजांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तारा उपस्थित भाविकांना केवळ श्रावण मस्तच नाहीतर नित्य नेमाने नामजप केल्यास मनुष्य सर्व दुःखातून बाहेर येतो यासाठी नामस्मरण करत चला असा संदेश देऊन ॐ नमः शिवाय नामजप सोहळ्याचा समारोप करण्यात आला. समारोप प्रसंगी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.



आगामी धार्मिक कार्यक्रमांची माहिती
मार्गदर्शन करताना व्यंकट स्वामी महाराज म्हणाले की, पिंपळगाव येथे येत्या वर्षात शिवमहापुराण कथेप्रमाणेच हजारो संत–महंतांच्या उपस्थितीत मोठे धार्मिक सोहळे होणार आहेत. या सोहळ्यांसाठी राजेंद्रदास महाराज तर येतीलच बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र शास्त्री, रामदेव बाबा यांच्यासह अनेक नामवंत संतांच्या दर्शनाचा लाभ मिळणार आहे. आत्तापासूनच विविध गावकऱ्यांकडून सेवाकार्याची तयारी सुरू झाली आहे. अपनी या धार्मिक सत्संग सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित होऊन योगदान द्या असे आवाहनही स्वामीजींनी केले.


