नांदेड| प्रचलित धर्मविषमतेची श्रृंखला आपल्या समतावादी विचारांनी भेदून समाजाला नवनिर्माणाची दिशा देणाऱ्या क्रांतीसुर्य महात्मा बसवेश्वर यांच्या पाठीमागे आक्का (बहीण – आई) नागाई यांच्या प्रेरणेची दिशा होती असे प्रतिपादन विठ्ठलराव ताकबीडे यांनी केले. अक्का नागाई यांच्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैजनाथ तोनसुरे हे होते. सर्वप्रथम उद्घाटन ज्योती देशमुख यांनी केले. संजय कोठाळे हे प्रामुख्याने उपस्थित होते.

वैदिक संस्कारांचा पगडा असणाऱ्या समाजात धार्मिक कर्मकांडांत तसेच विधीत असमानतेची बीजे रुजलेली होती. त्या कर्मकांडांना तर्कशुद्ध विचारांची जोड महात्मा बसवेश्वर यांनी दिली. गृहत्याग स्विकारून देशाबाहेर जातांना अक्का नागाईंनी महात्मा बसवेश्वर यांना जीवनभर साथ दिली. कर्मकांडांनी पिचत बसलेल्या समाजास नवविचारांची जोडणी देण्यास अक्का नागाई यांनी पाठबळ दिले. अनुभव मंडपाच्या निर्मिती व्यवस्थेत हातभार लावला. बसवकल्याण येथील महामने येथील घरात अनुभव मंडपाच्या क्रियाकलापात अजोड कार्य केले.

अक्का नागाई यांच कार्य महत्मा बसवेश्वरांच्या भागिनी, अनुभवमंडपाचे दुसरे सभापती झालेले चन्नबसवेश्वर या बुद्धीमान पुत्राची आई, अनुभव मंडपात येणाऱ्या साडेसातशे शरणार्थींची माता असे त्यांचे कार्याची पाश्वभुमी आहे . वचनसाहित्याचे जतन व संरक्षण करण्यासाठी श्वासाच्या शेवटापर्यंत प्राणपणाने लढणाऱ्या अक्का नागाई याच होत.


शितत्त्व हे सर्वश्रेष्ठ आहे. आपण शिवतत्वाचे स्विकार करून लिंगधारण करावा. शिवाधरणा करावी. शिवसंस्कृतीचे पालन करावे. आपली थोर परंपरा जतन करतांना वीरशैव समाजातील वचनांना आपण अभ्यासणं गरजेचं आहे. अनुभव मंडपाचं तत्त्व कायक तत्त्व आहे. दिवसभर काम करावे व नंतर सायंकाळी अनुभव मंडपातील चर्चांत भाग घ्यावा हे तत्त्व स्विकारावे. अक्का नागाई व महात्मा बसवेश्वरांच्या मनातील कणव मनी बाळगावा. अठरा पगड जातींतील व्यक्तींना आपलंस करण्याची मनोभूमिका ठेवावी. नव विचारांसाठी, पुढे जाण्यासाठी वचनांचा अभ्यास करूया. ग्रंथ वाचूया. ज्ञानाची – विचारांची साठवण करूया. समाज जडणघडणीसाठी थोर महात्मांची जीवन कार्याने पुनीत होऊन समाजधर्मियांसाठी एकवटून कार्य करूया. संघटन – प्रबोधन – परिवर्तन हे सुत्र स्विकारूया असेही त्यांनी प्रतिपादन केले.

सर्वोदया स्कूल, काबरानगर येथे हा कार्यक्रम पार पडला. शिवकन्या कुंभारगावे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी सुनंदा पेशवे, उद्घाटक ज्योती देशमुख यांनी समायोजित मनोगत व्यक्त केले. यावेळी वीरशैव समाजातील बहुसंख्य बंधु – भगिनी यांची उपस्थिती होती. समाजभगिनी शिवकन्या पटवे यांनी सुत्रसंचालन केले. शिवा कर्मचारी महासंघाचे जिल्हा सरचिटणीस शिवकुमार देशमुख यांच्या आभाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

