Thursday, May 14

Prakash Rathod : तांडा समृद्धी योजना अंतर्गत तांडा विकासासाठी ५०० तांड्यांना निधी द्या – प्रकाश राठोड

हदगांव, शेख चांदपाशा| महाराष्ट्र शासनाने राज्यातील ४ हजार तांड्यांची नोंद केली असून, बंजारा-लमाण समाजाच्या विकासासाठी “संत सेवालाल महाराज बंजारा-लमाण तांडा समृद्धी योजना” लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी ५०० तांड्यांना निवडून निधी दिला जातो. मात्र यंदा शासन निर्णयाच्या अभावामुळे योजनेंतर्गत निधी वितरण होऊ शकलेले नाही. त्यामुळे तातडीने शासन निर्णय काढून ५०० तांड्यांना निधी वितरित करावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश राठोड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

या योजनेअंतर्गत तांड्यांमध्ये मूलभूत सुविधा, पायाभूत विकास, शुद्ध पाणी, रस्ते, आरोग्य सुविधा व इतर गरजांची पूर्तता करण्यात येते. यामुळे तांडा वस्तीतील लोकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होते. अनेक तांडे हे मागास व दुर्लक्षित आहेत. त्यामुळे या योजनेचा निधी वेळेवर उपलब्ध होणे गरजेचे आहे.राठोड यांनी सांगितले की, शासनाच्या निर्देशानुसार मागील वर्षांतील निवड यादीनुसार निधी वाटप करता येते.

त्यामुळे यंदाही मागील वर्षी निवड झालेल्या ५०० तांड्यांना निधी वितरित करावा. तसेच योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करावी, जेणेकरून लाभार्थ्यांना वेळेवर व पारदर्शक सेवा मिळू शकेल. शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, जेणेकरून बंजारा-लमाण समाजाच्या मागास तांड्यांचा विकास होईल व समाजाला न्याय मिळेल, असेही प्रकाश राठोड यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!