हिमायतनगर | वर्ष २०२३-२४ पासुन नांदेड जिल्ह्यातील हजारो अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकर्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून विहीरीचे खोदकाम व बांधकाम योग्य वेळेत केले. शासनाचा निधी मिळण्याच्या आधी त्यांना सर्व काम पूर्ण करावे लागले. गोरगरीब शेतकर्यांनी कर्ज घेऊन, उसने पैसे घेऊन, काही गहाण ठेऊन आणि काहींनी तर गुरेढोरे विकुन कसेबसे काम पूर्ण केले. त्यांची बिलं ही एका एका वर्षांनी मिळाली. त्यानंतर वीज जोडणी साठी अर्ज करून कोटेशन चा भरणा सुद्धा केला असताना जवळ जवळ दोन वर्षे होत आहेत.

मात्र अद्याप त्यां शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळाली नाही. उलट महावितरण कडून सौर ऊर्जा पॅनल बसवून घेण्याची सक्ती होत आहे. हा खुप मोठा अन्याय शेतकरी बांधवांवर होत आहे. असा आरोप नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग जिल्हा उपाध्यक्ष संतोष आंबेकर यांनी केला आहे.

“मागेल त्याला सौर पंप योजना” शासन राबवत आहे परंतु ज्यांनी वीज जोडणी साठी अर्ज केला त्यांना सौर पंप घेण्याची सक्ती कशासाठी? सदरील योजनेचे स्वरुप हे विहीरीचे खोदकाम, बांधकाम व नवीन वीज जोडणी असे असताना शासन सौर पंपाची सक्ती कशाच्या आधारावर करत आहे. असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.


जर शासनाला नवीन वीज जोडणी द्यायची नव्हती तर शेतकर्यांनी नवीन वीज जोडणीसाठी कोटेशन भरले आहेत त्यांचे कोटेशन शासनाने का स्विकारले? कोटेशन भरून दोन दोन वर्षे उलटुन आपल्या ग्राहकांना नवीन वीज जोडणी न देता भरलेले कोटेशन चे पैसे जबरदस्तीने परत केले जात आहेत अशा प्रकारे शेतकर्यांवर दडपशाही करणे सरकारला शोभते का ? अशी सर्वसामान्य शेतकर्यांची भावना आहे.

महावितरण कार्यालय हिमायतनगर यांना आज देण्यात आलेल्या निवेदनात शेतकर्यांना वितरित होणारे चेक थांबवावे व नवीन वीज जोडणी देण्याचे मान्य करावे अन्यथा महावितरण विरोधात जिल्हाध्यक्ष सुरेश हाटकर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी दयानंद वाघमारे, सतिष रूद्रबोईनवाड, डॉ. गफार कारलेकर व इतर शेतकरी बांधव उपस्थित होते.

