हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील सोयाबीन पिकाची लागवड केल्यानंतर उगवण झाली आहे. सध्या पीक कोवळ्या स्थितीत असून गोगलगाय, पैसा, तेलनं या किडींनी हल्ला करण्यास सुरुवात केली असून, पहिल्यांदाच गोगलगायीचा प्रादुर्भाव होऊ लागल्याने शेतकऱ्यां समोर आता नवीन संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहण्याची भीती निर्माण झाली आहे. कोवळ्या पिकांना कसे वाचवायचे या विवंचनेने शेतकरी हवालदिल झाला आहे.


हिमायतनगर तालुक्यात झालेल्या मृग नक्षत्राच्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी उरकली असून, बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनची पिके वाऱ्यावर डोलू लागली आहेत. सध्याच्या स्थितीत पाऊस कमी अधिक प्रमाणात सुरू असून, त्यामुळे ढगाळ वातावरण असून, उष्णता वाढून जास्त प्रमाणात आद्रता निर्माण होत असल्याने गोगलगाय, पैसा, तेलनं या किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. या किडींचा पोषक वातावरण मिळाल्याने सोयाबीनच्या कोवळ्या पिकावर गोगलगाय, पैसा, तेलनं या किडींची आक्रमण करणे सुरु केले असून, सोयाबानची उभे पिके नष्ट होऊन शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येण्याची भीती व्यक्त होत आहे.


सध्या पीक कोवळ्या स्थितीत असून, गोगलगाय, पैसा किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. या किडींचा प्रादुर्भाव थंाबवण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे असताना हिमायतनगर येथील तालुका कृषी अधिकारी व त्यांचे कृषी सहाय्यक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात कमी पडत असल्याची खंत शेतकरी बोलून दाखवीत आहेत.



हि बाब लक्षात घेता जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी हिमायतनगर येथील कृषी अधिकाऱ्याचे कांन टोचून शेतकऱ्यांना किडीच्या प्रादुर्भावापासून होणाऱ्या नुकसानीच्या बाबतीत मार्गदर्शन करण्याच्या कडक सूचना द्याव्या. आणि प्रादुर्भावग्रस्त भागात गोगलगाय, पैसा किडींचे नियमित सर्वेक्षण करून त्या किडींचे नियंत्रण कसे करावे यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे अशी मागणी कडींच्या प्रादुर्भावाने हैराण झालेल्या शेतकरी वर्गातून केली जात आहे.
