construct Dak Bhavan : नांदेड आणि बिलोली येथे डाक भवन उभारणीच्या प्रस्तावासाठी पाठपुरावा

नांदेड| नांदेड आणि जिल्ह्यातील बिलोली येथे अत्याधुनिक असे डाक भवन उभारावे यासाठी केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे कडे फेब्रुवारी 2025 मध्ये संसद अधिवेशन काळात मागणी केली होती. त्याला अनुसरुन मंत्री महोदयांनी तात्काळ प्रस्ताव सादर करणे बाबत संबंधित विभागास सुचना केल्या होत्या.


जिल्हास्तरावरून केंद्राकडे प्रस्ताव सादर करणेची प्रक्रिया सुरु असुन त्याला गती देऊन मंजुरी द्यावी आणि आर्थिक तरतूद करावी यासाठी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. दिल्लीत काल ना .ज्योतिरादित्य सिंधिया यांची खा. गोपछडे यांनी भेट घेऊन डाक भवन उभारणीसाठी स्मरणपत्र दिले.

यानुषंगाने खा.डॉ.गोपछडे यांनी सांगितले की, नांदेड जिल्ह्यातील डाक सेवा अत्यंत महत्त्वपूर्ण असून, सध्या अस्तित्वात असलेली नांदेड डाक विभागाची कार्यालये ब्रिटीश कालीन जुन्या व अपुऱ्या इमारतींमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना तसेच नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.त्यामुळे नवीन विभागीय मुख्य डाक भवन नांदेड शहराच्या मध्यवर्ती भागात उभारल्यास जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना अधिक चांगली सेवा पुरवणे शक्य होईल. तांत्रिक सुविधा, आधुनिक यंत्रणा आणि नागरिकांना मिळणारी सेवा यामध्ये लक्षणीय सुधारणा होईल.


बिलोली हा नांदेड जिल्ह्यातील अत्यंत जुना आणि विस्ताराने मोठा तालुका आहे परंतु या तालुक्याचा म्हणावा तसा विकास झालेला नव्हता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वात बिलोली तालुक्याच्या विकासाच्या अनुषंगाने सकारात्मक प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे बिलोली तालुक्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तालुकास्थानी प्रस्तावित ‘स्वतंत्र डाक भवन’ हे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी सुलभ, जलद डाक सेवा अधिक विश्वसनीय बनवणे अत्यंत आवश्यक आहे.

सद्यस्थितीत बिलोलीचे डाक कार्यालय अपुऱ्या सुविधांमध्ये कार्यरत असून, नवीन इमारतीमुळे कर्मचाऱ्यांचे काम अधिक कार्यक्षम होईल आणि नागरिकांनाही चांगल्या सुविधा मिळतील.यासाठी येथे अत्याधुनिक डाक भवन उभारावे अशी मागणी करण्यात आली होती.यासाठी आवश्यक तो प्रस्ताव केंद्र शासनाकडे यापूर्वीच पाठविण्यात आला आहे. आता या कामाला मंजुरी मिळवून द्यावी आणि काम प्रत्यक्ष सुरू करावे यासाठी खा. डॉ. गोपछडे यांनी ना. सिंधिया यांची दिल्लीत भेट घेतली. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या मागण्यांना सकारात्मक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे अशी माहिती खा. डॉ. गोपछडे यांनी दिली आहे.



