Pre Monsoon Rain Nanded ; मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने नांदेड शहरात पाणीच पाणी; नाले सफाई झाली नसल्याने सखल भागातील घरांत शिरले पाणी

नांदेड,अनिल मादसवार। शहरासह जिल्हाभरात शुक्रवारी रात्री वादळी वारे, ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. या पावसामुळे नांदेड शहर परिसरात जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले असून, शहराच्या विविध प्रभागात नाल्यांची सफाई केली गेली नसल्याने सखल भागातील अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले असल्याने त्यांना रात्र जागून काढावी लागली आहे, यामुळे महानगरपालिका स्वच्छता विभागाच्या विरोधात नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आतातरी स्वच्छता विभागाने मान्सूनपूर्व नाल्याच्या सफाईकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली जाते आहे.



हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार शुक्रवार, दि. १६ मे रोजी रात्रीच्या सुमारास शहर व जिल्ह्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला. अचानक वादळी वारे, ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे खरेदीसाठी बाजारपेठेत आलेल्या नागरिकांची एकच धावपळ उडाली होती, तर मुख्य बाजारपेठ असलेल्या श्रीनगर, महावीर चौक, विष्णू नगर, वसंत नगर, व्यंकटेश्वर नगर भागांतील नाल्या तुंबलेल्या असल्याने या भागात रस्त्यावर पाणीचं पाणी येऊन वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना कसरत करावी लागली आहे. एव्हढेच नाहीतर नांदेड शहराच्या व्यंकटेशनगर, वसंतनगर, खडकपुरा, विष्णूनगर, मगनपुरा, देगलूर नाका, इस्लामपुरा आदी सखल भागात पाणी साचून नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने या भागातील नागरिकांना रात्र जागून काढावी लागली आहे.


तसेच नांदेड शहराच्या बोरबन फॅक्टरी भागात एका चारचाकी वाहनावर झाड उन्मळून पडले. पाऊस सुरू होताच महावितरणचा वीज पुरवठा खंडित झाल्याने शहरवासीयांना तासंतास अंधाराचा सामना करावा लागला, त्यामुळं डासांच्या प्रकोपाला सामोरे जावे लागले होते. महानगरपालिकेने मान्सूनपूर्व नाल्याची सफाई केली नसल्याने नाल्यातील दुर्गंधीयुक्त घाण पाणी रस्त्यावर साचुन सखल भागातील नागरिकांच्या घरांमध्येही घाण पाणी शिरले होते. एकूणच शहरात जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसून आल्याने महानगरपालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणाची पोल या अवकाळी पावसाने खोलली असल्याचे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही.



एकूणच नांदेड जिल्ह्यात देखील अवकाळी पावसामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांची दाणादाण उडाली होती, नायगाव तालुक्यात वीज पडून एक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून, वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तर बऱ्याच ठिकाणी विजेच्या तारा तुटून पडल्याने महावितरणचे नुकसान झाले असून, अनेक गावकऱ्यांना रात्र अंधारात काढावी लागली आहे. या अवकाळी पावसामुळे केळी, पपई, आंबा, यासह बागायती पिकांचे व जनावरांसाठी ठेवलेल्या वैरणाचे मोठे नुकसान झाले, तर अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेली आहेत. याचा फटका हिमायतनगर, भोकर, हदगाव, अर्धापुर, नायगाव, मुखेड, कंधार, लोहा, मुदखेड, बारड, नांदेड शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागालाही बसला आहे. तर नायगाव तालुक्यात एका ३० वर्षीय व्यक्तीच्या अंगावर वीज पडून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.



