
लोहा| लोहा तालुक्यातील अंतेश्वर बंधाऱ्याचे पाणी अहमदपूर येथे नेण्यासाठी राज्याचे सहकार मंत्री हे आग्रही आहेत प्रशासकीय पातळीवर तशी जोरदार तयारी सुरू आहे. त्याविरोधात शेतकरी नेते माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी यास तीव्र विरोध दर्शविला असून, मंत्रालय पातळीपर्यंत आणि त्याही पुढे जाऊन या निर्णया विरोधात न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्णय अंतेश्वर बंधारा कृती समितीने घेतला आहे. पण शेतकऱ्यांचे नाव घेऊन राजकीय हेतू समोर ठेवून पुन्हा समिती गठीत करणाऱ्या सत्ताधारी भाजपाच्या “बेगडी “पणा कळवळा जनतेला माहिती आहे त्यांना या प्रश्नाचे काहीच घेणेदेणे या शब्दात माजी शिक्षण सभापती व अंतेश्वर बंधारा सर्व पक्षीय कृती समितीचे अध्यक्ष संजय पाटील कऱ्हाळे यांनी समाचार घेतला .


राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी लोहा तालुक्यातील अंतेश्वर बंधाऱ्यातून अहमदपुर तालुक्यात शेती सिंचनासाठी पाणी नेण्याचे वक्तव्य केल्यानंतर शेतकरी नेते माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली लोहा तालुक्यातील सर्व पक्षीय नेते, कार्यकर्ते, शेतकरी यांना एकत्रित केले. अंतेश्वर बंधाऱ्याचे पाणी लोहा तालुक्यातील गावातील शेतकऱ्यांच्या शेतीला मिळावे व अहमदपुर तालुक्यातील झरी साठवण तलावात जाऊ नये यासाठी अंतेश्वर बंधारा कृती समिती स्थापन केली आहे. अध्यक्ष पदाची जबाबदारी माजी शिक्षण सभापती संजय पाटील कऱ्हाळे यांच्यावर सोपविण्यात आली.

अंतेश्वर बंधारा कृती समितीने माजी आ.शंकर अण्णा धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर येथे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना भेट घेतली चर्चा केली निवेदन दिले. विधीमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देण्याचे असल्याचे ठरले तसेच मंत्रालयात या बाबत कार्यवाही व्हावी म्हणून पाठपुरावा सुरू आहे. पण दोन दिवसापूर्वी भाजपाच्या काहीं मंडळींनी दुसरी समिती केली आहे.


खरे तर हा सर्व विषय प्राथमिक टप्प्यात आहे.भाजपाचे सर्वेसर्वा राज्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्याकडे हा मंडळीने विषय मांडला पाहिजे होता. तसेच माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासारखे मोठे पक्षात असताना तगाच्याकडे पाठपुरावा करणे अपेक्षित होते पण केवळ प्रसिद्धीसाठी व आंदोलन दिशा भटकविण्यासाठी धरणे, आंदोलन व इतर खटाटोप या भाजपा मंडळीने सुरू केला आहे. या भागातील स्थानिक भाजपाच्या मंडळींला येथील शेतकऱ्यांचे देणे घेणे दिसत नाही. त्यांना केवळ या विषयांचे राजकारण करायचे आहे. या शब्दात अंतेश्वर बंधारा बचाव कृती समितीचे सर्व पक्षीय अध्यक्ष माजी शिक्षण सभापती संजय पाटील कऱ्हाळे यांनी स्पष्ट केले .




