नांदेड| जीवनात संगत कुणाशी करायची, सोबती कोण आहे, कसा आहे याची जाणीव आपल्याला असली पाहिजे, असंगाशी संग करून आपले जीवन, आपले आयुष्य उध्वस्त होईल, अशी वर्तणूक करू नका, वाईटाची संगत सोडा, त्याचेही जीवन सुधारण्याचा प्रयत्न करा, तो ऐकत नसेल तर त्याचा त्याग करा, अन्यथा तुमचे जीवन अधोगतीच्या मार्गावर जाईल,असे आवाहन पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी शिवमहापुराण कथेच्या सातव्या आणि अखेरच्या दिवशी केले. लाखो भाविकांच्या उपस्थितीत गुरुवारी सकाळी या कथावाचनाची अत्यंत भक्तीभावाने सांगता झाली.

गुरुवारी शिवमहापुराण कथेच्या सातव्या दिवशी पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी शिवमहापुराण कथेचा महिमा, महात्म्य आणि शिवजींच्या साक्षात्काराची महती कथन केली.कलयुगात सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण करणारी कथा म्हणजे शिवमहापुराण कथा आहे. वाईटाची संगत वाईटच असते,ज्याप्रमाणे आपण अग्नीला स्पर्श केला, तिच्या जवळ गेलो तर आगीचा चटका बसतो, तशीच ही वाईट संगत असते. मोबाईलचा वाढता अनावश्यक वापर अत्यंत धोकादायक आणि चिंताजनक असल्याचे सांगून गुरुजींनी कुटुंबातील सदस्यांसोबत एकत्रित संवाद साधून एकमेकांबद्दल आपुलकी, स्नेह वाढविण्याचा सल्ला दिला.


मोबाईल बाजुला ठेवून आईवडिलांनी मुलांशी संवाद साधला पाहिजे, त्यांचा अभ्यास, शैक्षणिक प्रगती, गुणवत्ता, संगत याबाबत वारंवार विचारणा केली पाहिजे, शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांचा आत्मविश्वास वाढवा, त्यांना मानसिक बळ द्या, मुलांना वेळ द्याल, तर भविष्यात तो तुम्हाला वेळ देईल अन्यथा तुमच्यावर पश्चातापाची वेळ येईल.भगवंत उपासना, भक्तीलाही वेळ द्या, संकटात ईश्वर सुद्धा तुम्हाला नक्कीच वेळ देईल. संकट आले म्हणून ईश्वराकडे धाव घेण्यापेक्षा नित्यनियमाने शिवशंकराला जलार्पण करा, असाही गुरुमंत्र त्यांनी दिला. जोपर्यंत श्वास चालेल,तुमचे शरीर चालेल, घरात तुमचे विचार चालतील तोपर्यंत भजन, किर्तन,दान-धर्म,तीर्थयात्रा करा, मुलांना शिक्षण द्या, जेव्हा शरीर थकेल तेव्हा तुम्हाला यातील एकही बाब करता येणार नाही.


॥ कोई जल्दी बनता है। कोई लेट बनता है।
॥शिवजी पर जल चढानेवाला सेठ जरुर बनता है।
भगवंतावर विश्वास ठेवला पाहिजे, श्रद्धा, विश्वास, प्रेम, सत्य शिवजींना प्रिय आहे, परधन आणि परस्त्री यापासून दूर रहा, असेही गुरुदेव म्हणाले.
कथेचा समारोप करताना पंडितजींनी जिल्हा प्रशासन, पोलीस दल, महानगरपालिका, सर्व लोकप्रतिनिधी व अधिकारी, कर्मचार्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करून उपस्थित लाखो भाविकांना नमन केले. कथा आयोजक डॉ.शिवराज नांदेडकर, प्रशांत पातेवार यांनीही सर्वांचे आभार व्यक्त करून पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे पुन्हा एकदा नांदेडवासियांसाठी अवश्य आयोजन करू, असा विश्वास व्यक्त केला.


