श्रीक्षेत्र माळेगाव | “उत्तम जागा पाहुनी मल्हारी देव नांदे गड जेजुरी…” अशा जयघोषात यळकोट यळकोट जय मल्हार म्हणत, बेलभंडाऱ्याची उधळण करत पारंपरिक पद्धतीने यंदाही श्रीक्षेत्र माळेगाव येथील श्रीखंडोबा रायाच्या यात्रेस भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली. देवस्वारी व पालखी पूजनाच्या सोहळ्यासाठी हजारो भाविकांनी उपस्थिती लावून पालखीचे दर्शन घेतले.


खंडोबाच्या व मानकऱ्यांच्या पालखीचे प्रतिवर्षाप्रमाणे शासकीय विश्रामगृहावर जिल्हा परिषदेच्या वतीने स्वागत करण्यात आले. दुपारी पालखी पूजनानंतर देवस्वारी काढण्यात आली, यावेळी मानकऱ्यांचा विधीवत गौरव करण्यात आला. या सोहळ्यास सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, राज्य मंत्री मेघना बोर्डीकर, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, जि. प. माजी सभापती प्रविण पाटील चिखलीकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली, सामाजिक कार्यकर्त्या प्रणिताताई देवरे-चिखलीकर, शिवानंद हेगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मानकऱ्यांचा गौरव – पालखीचे मानकरी गणपतराव मल्हारी नाईक (रिसनगाव), गोविंदराव नागेशराव महाराज (कुरुळा), व्यंकटराव मारोतीराव पांडागळे (शिराढोण), खुशाल भगवानराव भोसीकर (पानभोसी), गोविंदराव बाबाराव नाईकवाडे (पानभोसी), पांडुरंग नारायणराव पाटील (माळेगाव), मल्हारी रावसाहेब पाटील (माळेगाव), विजयकुमार शंकरराव कनकंदडे, आंबादास खंडेराव जहागीरदार यांचा जिल्हा परिषदेच्या वतीने जोडआहेर व मानाचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला.



यात्रेत वाघ्या–मुरळींची सेवा – “उत्तम जागा पाहुनी मल्हारी देव नांदे गड जेजुरी, उत्तराची जेजुरी गडाला नऊ लाख पायरी…” असा घोष करीत वाघ्या-मुरळींनी पारंपरिक पद्धतीने खंडोबाची सेवा केली. कवड्यांच्या माळा, हळदीचा मळभट, हातापायांवर चाबकाचे फटके मारत सादर होणाऱ्या या सेवेने भाविकांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला. वाघ्या-मुरळी पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.


यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, जी. बी. गिरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, अमित राठोड, प्रशांत थोरात, मयूरकुमार आंदेलवाड, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, माधव सलगर, पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. प्रविणकुमार घुले, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. निलकुमार ऐतवडे, आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी विश्वास वाघमारे, गट विकास अधिकारी महेंद्र कुलकर्णी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
प्लास्टिकमुक्त व सुरक्षित यात्रा – यात्रेत वाघ्या-मुरळी, पोतराज व डफवाल्यांच्या सहभागामुळे वातावरण भक्तीमय झाले होते. भाविकांसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने प्लास्टिकमुक्त व स्वच्छ यात्रेचा संकल्प राबविण्यात येत असून, सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मजबूत व्यवस्था करण्यात आली आहे.

