श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| शहरातील मुख्य महामार्गावरील त्रिमूर्ति पेट्रोल पंप ते ग्रामीण रूग्णालय पर्यंतचे पथदिवे तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झाले आहेत. यामुळे अंधाराचे साम्राज्य असलेला मार्ग आता प्रकाशमाय झाला आहे.


या करीता किनवट/माहूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार भीमरावजी केराम, माहूरचे तहसीलदार अभिजीत जगताप नगरपंचायतचे मुख्याधिकारी विवेक कांदे यांच्या संयुक्त प्रयत्नातून यशस्वी झाला. विशेष म्हणजे, केवळ आठ दिवसांच्या आत नवीन डीपी बसवून विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला व आज दि 19 सप्टेंबर रोजी महामार्गावरील अंधार दूर झाला.


गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेले हे पथदिवे शारदीय नवरात्राच्या पार्श्वभूमीवर कार्यान्वित झाल्याने भाविक व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. नवरात्राच्या दोन दिवसांपूर्वीच प्रकाशयोजना सुरू करून माहूरवासीयांना एकप्रकारे ‘नवरात्राची भेट’च असल्याची प्रतीक्रिया भाजपा शहराध्यक्ष,नगर सेवक गोपू महामूने यांनी दिली. स्थानिक नागरिकांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त करत आमदार, तहसीलदार व नगरपंचायत प्रशासनाचे आभार मानले.



