Unique Latur Pattern : अनोखा लातूर पॅटर्न : ‘वेळ अमावस्या’-मातीशी नाळ जोडणारा लोकोत्सव!
मराठवाड्याचे ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव यांच्या कवितेतील ओळी लातूरच्या कृषी संस्कृतीला तंतोतंत लागू पडतात. ते म्हणतात, "काळ्या आईची कुशी, पिकं जोमाने डुलती, माझ्या राजाचं हे रान, जणू हिरवं सोनं..." या ओळींचा खरा प्रत्यय लातूरच्या 'वेळ अमावस्येला' येतो. हा केवळ एक सण नाही, तर हा मातीशी नाळ जोडणारा एक महत्त्वाचा सांस्कृतिक दस्तावेज आहे. मार्गशीर्ष महिन्यातील अमावास्येला सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत संपूर्ण लातूर जिल्हा शेतात असतो, निसर्गाच्या ऋणाचा हा उत्सव मोठ्या उत्साहात येथे साजरा केला जातो.
येळवस, दर्शवेळ किंवा वेळ अमावस्या अशा विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या या सणाची परंपरा तब्बल सातशे वर्षांची आहे. लातूर आणि धाराशिव जिल्ह्याचा हा भाग पूर्वी निझाम राजवटीत असल्याने येथे कानडी भाषेचा प्रभाव आजही जाणवतो. कानडीत 'वेल्ली' म्हणजे पीक. पिकांची पूजा म्हणून हा शब्द रूढ झाला असावा. तसेच...
